कारखानदारांकडून प्रतिक्विंटल ५० रुपयांची वाढ पुणे : साखर कारखानदारांकडून प्रतिक्विंटल ५० रुपये दरवाढ करण्यात आली आहे. कारखानदारांनी केलेल्या दरवाढीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.साखर कारखानदारांनी केलेल्या दरवाढीमुळे घाऊक बाजारात प्रतिक्विंटल साखरेच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचे दर येत्या काही दिवसात वाढतील. प्रतिक्विंटल ५० रुपयांच्या दरवाढीनंतर साखर कारखानदारांनी पुन्हा प्रतिक्विंटल दोनशे रुपये वाढीची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने दरवाढीला मंजुरी दिल्यास घाऊक बाजारात साखरेच्या प्रतिक्विंटलच्या दरात २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती घाऊक बाजारातील साखर व्यापारी विजय गुजराथी यांनी दिली. या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलो साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना सध्या ३१ रुपये किलो या दराने साखर मिळते. साखर कारखानदारांनी दरवाढ केल्यास व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल साखर ३३०० रुपयांना उपलब्ध होईल. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर होईल. येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात साखरेच्या दरात वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील प्रतिबंधित भागातील व्यवहार काही प्रमाणावर सुरू झाले असले तरी काही भागात र्निबध कायम आहेत. हॉटेल, खाणावळी, मिठाईची दुकाने बंद आहेत. त्यामुळे साखरेची मागणी कमी आहे. शहरातील व्यवहार सुरळीत झाल्यास मागणीत वाढ होऊन किरकोळ बाजारात साखरेच्या दरात वाढ होईल, असे गुजराथी यांनी नमूद केले. किरकोळ बाजारात ४२ रुपये किलोची शक्यता घाऊक बाजारात साखर महागल्यास किरकोळ बाजारात एक किलो साखर साधारणपणे ४२ रुपये किलो या दराने विकली जाईल. सध्या किरकोळ बाजारात एक किलो साखर ३९ ते ४० रुपये किलो या दराने विकली जात आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेतल्यास दररोज १५ ते २० ट्रक साखर लागते, असे साखरेचे व्यापारी विजय गुजराथी यांनी सांगितले.