तांत्रिक बिघाडाची माहिती देण्याचे आवाहन
पावसाळ्यातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा यंत्रणेच्या मान्सूनपूर्व दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू करण्यात आली असून, अनेक कामे पूर्णत्वाकडे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. आपल्या भागात पावसाळ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटनेची शक्यता असल्यास त्याची माहिती तातडीने देण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व कामांमध्ये आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती तसेच तारा ओढणे, उपकेंद्राची देखभाल, वाकलेले विजेचे खांब सरळ करणे, गंजलेले व तुटलेले खांब बदलणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्याची छाटणी, भूमिगत वीजवाहिनी टाकणे, तारांचे मजबुतीकरण आदींचा समावेश आहे. खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेवर झाडे किंवा मोठय़ा लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा मोठय़ा फांद्यांची संबंधितांनी पालिकेची परवानगी घेऊन छाटणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. या क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रार दाखल करता येते. त्याचप्रमाणे अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठय़ात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्याच्या ठिकाणही माहितीही या क्रमांकावर देता येते.