केवळ पैशांसाठी नाही तर, प्रसंगी कर्ज काढून चित्रपटनिर्मिती करीत मराठीची पताका केवळ देशभरातच नाही तर परदेशातही फडकविणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या संस्थापकांना बुधवारी अभिवादन करण्यात आले. १ जून या प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे प्रभात दिन साजरा करण्यात आला. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (पूर्वीची प्रभात फिल्म कंपनी) येथे विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी आणि व्ही. शांताराम या प्रभातच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झालेल्या कार्यक्रमात आगाशे यांच्या हस्ते दामले आणि कुलकर्णी यांच्या वारसांचा तसेच राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या रिंगण चित्रपटातील कलाकारांचा या वेळी सत्कार करण्यात आला. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, निर्माते बाबासाहेब बांगर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात डॉ. माधवी वैद्य दिग्दर्शित ‘इट्स प्रभात’ हा प्रभात फिल्म कंपनीच्या वाटचालीवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचे प्रभात चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था असे नामकरण करावे, अशी मागणी चित्रपट महामंडळातर्फे केंद्र सरकारकडे लवकरच करण्यात येणार असल्याचे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. महामंडळाचा आवाज खासदारांमार्फत संसदेमध्ये उमटत नाही तोपर्यंत काही होणार नाही. पुण्याच्या खासदारांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी अपेक्षा रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली. नवी पिढी चांगले चित्रपट करीत आहे. पण, आपली वितरण व्यवस्था जुनाट असल्याने हे चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. चित्रपटगृहांवर ज्यांचा ताबा आहे अशांचेच चित्रपट प्रदर्शित होतात. चांगल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाने कोटीची उड्डाणे घेतली असली तरी चित्रपटांचे वास्तव वेगळे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.