लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या वेळी काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारुन ‘ड्रामा’ केल्याचा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अविश्वास प्रस्तावावर आपली भूमिका मांडली.

जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी यांचे भाषण अपरिपक्व होते. त्यांच्याकडे मुद्दे देखील नव्हते. त्यांनी भाषणात राफेल कराराबाबत मांडलेली भूमिका लक्षात घेता, त्यांचा गृहपाठ कच्चा असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारातून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. तसेच लोकसभा हे नाटक करण्याचे ठिकाण नसून यामुळे विरोधकांची दुरवस्था झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.