पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले डोळे उघडे ठेऊन मुस्लिम समाजाच्या प्रश्नांकडे पहावे तसेच आपल्या मेंदूवरील जळमटे काढून टाकावीत. तुम्ही मुस्लीम जनतेचे दुःख समजून घेणारे नेते नाहीत. तुम्ही आमचे शत्रू आहात आणि आमच्यासोबत अन्याय कसा होईल याची तयारी करीत आहात, अशा घाणाघाती शब्दांत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकवरुन पंतप्रधानांसह केंद्र सरकारवर शनिवारी तोफ डागली. ते पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.


या कार्यक्रमापूर्वी केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुण्यातील मुस्लिम महिलांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचा आपल्या भाषणात उल्लेख करीत ओवेसी म्हणाले, आज आमच्या आई आणि बहिणींनी तिहेरी तलाक विरोधातील मोर्चात सहभाग घेऊन अन्यायी सरकारला इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुस्लिम तरुणांना आणि ज्येष्ठांदेखील त्यांनी शरियतच्या बाजूने उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

काँग्रेसला सल्ला देताना ओवेसी म्हणाले, काँग्रेसने अर्धा हिंदुत्ववाद सोडावा छोटा मोदी होऊ नये. दरम्यान, अयोध्या प्रश्नावर सिरियाचा उल्लेख करणाऱ्या अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सिरिया सोडूनच द्या, या देशातील इंच् इंच जमिनीवर आमचे प्रेम आहे. भारताला सिरिया बनवू पाहणाऱ्यांनी २५ जन्म जरी घेतले तरी भारत सिरिया होणार नाही, कारण भारताची मुळे हीच मुळात लोकशाहीची आहेत. त्यामुळे सिरियाचे उदाहरण देत जे लोकांना भिती घालत आहेत त्यांना या देशाशी प्रेम नाही. तसेच जो घाबरत आहे, तो भारतीय नाही, अशा शब्दांत ओवेसी यांनी श्री श्री यांच्यावर टीका केली.


दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. आमच्या अल्लाहने आमच्यासाठी जो कायदा बनवला आहे, तोच आमच्यासाठी योग्य आहे. आमच्यामध्ये तिहेरी तलाक हा प्रकारच नाही, लोकांनी हा गैरसमज पसरवला आहे, अशा प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लिम महिलांनी दिल्या आहेत.