‘‘आरोग्यसेवा संपूर्ण तांत्रिक झाली असून रुग्णायले व आरोग्य सेवेशी निगडित कंपन्या नफ्या-तोटय़ाच्या फेऱ्यात अडकली आहेत. त्यामुळे एकप्रकारचे परावलंबन निर्माण झाले असून त्यातून गुलामी व दुबळेपणा आला आहे. या गुलामीतून मुक्त होण्यासाठी ‘आरोग्य स्वराज्य’ ही संकल्पना महत्त्वाची आहे, असे मत डॉ.राणी बंग यांनी शनिवारी व्यक्त केले.
 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवी) २६ व्या पदवीप्रदान समारंभात डॉ. बंग बोलत होत्या. यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांना टिमवीकडून डी.लीट पदवी देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलपती न्या. विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉ.दीपक टिळक व कुलसचिव डॉ.उमेश केसकर उपस्थित होते. य सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होते. यावेळी डी.लीट बरोबरच ५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ८४ विद्यार्थ्यांना पी.एचडी. तर ४ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. बंग यांनी आपला प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘ शिक्षणाचा आणि शहानपणाचा कवडीचाही संबंध नाही, असा विश्वास आदिवासी समाजाकडे पाहिला की पटतो. आदिवासींना आपण मूर्ख संबोधतो, पण ते जास्त सुसंस्कृत आहेत. आदिवासी लोक खोटं बोलत नाहीत. ते चोरी करत नाहीत. हुंडा घेत नाहीत, त्यामुळे हुंडाबळीसारख्या घटना त्यांच्यात घडत नाहीत. बलात्कार, विनयभंग होत नाहीत. एकटी मुलगी निर्भयतेने फिरू शकते.’
  डॉ.ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘‘आर्याच्या मूळ स्थानाबाबत आजही गोंधळ घातला जातो. याविषयात लोकमान्यांनी केलेल्या संशोधनाचे मात्र आपल्याला नेहमीच कुतूहल वाटले असून तंत्रज्ञान नसतानाही त्यांनी आर्याचे मूळ स्थान निश्चित केले. सध्या लोकांना रूचेल असेच संशोधन  करावे लागते.’’