पुणे मेट्रो आणि रिंग रोड प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. राज्यातील टंचाईवर मात करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सासवडकडून पुण्याला जाणाऱ्या वाय आकाराच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. महापौर वैशाली बनकर, खासदार वंदना चव्हाण, आमदार महादेव बाबर, जयदेव गायकवाड, बापू पठारे, माजी आमदार अशोक टेकवडे, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेवक विजय देशमुख, चेतन तुपे, बाबूराव चांदेरे, प्रशांत जगताप, विजया कापरे, रंजना पवार, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले याप्रसंगी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शरद पवार यांनी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राजकीय नेते, खासदार यांनी एक महिन्याचे वेतन दिले असून, राजकारण बाजूला ठेवून सर्वानी एकत्र आले पाहिजे. घोरपडी आणि मांजरी येथील रेल्वेरुळावरील उड्डाणपुलासाठी रेल्वे खाते जेवढा निधी देईल तेवढाच वाटा राज्य सरकारदेखील उचलेल. पावसाचे पाणी अडवण्यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियान राबविण्यात येणार असून, त्यामुळे दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे शक्य होणार आहे.
हडपसर येथे छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आमदार महादेव बाबर यांनी केली. या पुतळय़ाच्या उभारणीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. शिवाजी भागवत यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश दुष्काळ निधीसीठी दिला.