पं. व्यंकटेशकुमार यांचा सत्कार पं. व्यंकटेशकुमार यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात यमन रागातील बंदिशीने झालेली सुरेल सुरुवात आणि बसव वचन, दास वचन यासारख्या नेहमी ऐकायला न मिळणाऱ्या कानडी संतरचना ऐकताना रसिक तल्लीन झाले. ‘संगीताचार्य द. वा. काणेबुवा प्रतिष्ठान’ व ‘तालचक्र’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात किराणा व ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. व्यंकटेशकुमार यांचा ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर व्यंकटेशकुमार यांची मुलाखत तसेच गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. व्यंकटेशकुमार यांचा नुकताच पद्मश्री सन्मान प्रदान करून गौरव करण्यात आला. या निमित्ताने पुणेकरांच्या वतीने हा सत्कार झाला. ‘हा व्यंकटेशकुमार यांचा नव्हे, तर जणू माझाच सन्मान आहे,’ अशा शब्दांत चौरासिया यांनी व्यंकटेशकुमार यांचे कौतुक केले. ‘त्यांच्याएवढा ताकदीचा आवाज दुर्मिळ असून त्यांचे श्रेय त्यांना द्यायला हवे,’ असेही ते म्हणाले. प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे व प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी व्यंकटेशकुमार यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान व्यंकटेशकुमार यांनी आपला संगीताचा प्रवास उलगडला. गदग येथे बारा वर्षे राहून घेतलेले संगीताचे शिक्षण, गुरू म्हणून लाभलेल्या दिग्गजांची संगीतातील सर्वोच्च कामगिरी याबाबत त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘संगीताची साधना आपण कशी करतो हे फार महत्त्वाचे आहे. त्यात भाव असायला हवा. आजकाल सर्वानाच पंडित म्हटले जाते, परंतु ज्यांची खूप मोठी साधना असते ते पंडित! पं. भीमसेन जोशी यांना मी लहानपणापासून मानायचो. ते माझे संगीतातील ‘हीरो’ आहेत. आयुष्यात जेवढा वेळ मिळेल त्यात संगीताचाच विचार करायचा आहे.’ घाटे आणि प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांनी व्यंकटेशकुमार यांना साथसंगत केली. डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.