महाराष्ट्रात करोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दोन  रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे या दाम्पत्याचा पाडवा गोड झाला आहे. ९ मार्च रोजी या दोघांना नायडू रुग्णालयात आणलं होतं. हे दाम्पत्य दुबईहून पुण्यात आलं होतं. ते करोना पॉझिटिव्ह ठरले होते. मात्र दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली. या दाम्पत्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे.

दुबई येथून आलेले पती पत्नी करोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर १४ दिवस उपचार केल्यानंतर दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे आज नायडू रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावरून दोघांना खाली आणण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्या दोघांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. त्याना आता रुग्णवाहिकेतून  घरी  थोड्याच वेळात सोडले जाणार आहे.

पुण्यात आढळलेलं करोनाग्रस्त दाम्पत्य हे महाराष्ट्रातले पहिले दोन करोनाग्रस्त रुग्ण होते. ते दुबईहून मुंबईत आले आणि मुंबईहून पुण्यात टॅक्सीने आले होते. ९ मार्च रोजी ते मुंबईहून पुण्यात आले होते. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरलाही करोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली. मात्र हे दाम्पत्य आज करोनातून खडखडीत बरं झालं आहे त्यांची दोन वेळा करोना चाचणी करण्यात आली जी निगेटीव्ह आली आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज नायडू रुग्णालयात या दाम्पत्याची मुलीसह आणखी दोघांची करोना चाचणी पुन्हा करण्यात येईल. ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्यांनाही घरी पाठवण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून कुणीही बाहेर पडणार नाही असे थेट निर्देशच केंद्र सरकारने दिले आहेत.