लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरसेवकांनी ‘पीएमपीचा मार्ग’ स्वीकारला आहे. पीएमपीने सुरू केलेल्या पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास या पीएमपीच्या ‘अटल योजने’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आपल्या प्रभागातही नवे मार्ग सुरू करण्याचा उपक्रम नगरसेवकांनी पीएमपीच्या माध्यमातून सुरू के ला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात अनेक प्रभागात पीएमपीचे मार्ग सुरू झाले असून नवे मार्ग सुरू करण्यासाठी नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास अशी अटल योजना सुरू केली आहे. त्यासाठी लहान आणि मध्यम आकाराच्या गाडय़ा दैनंदिन काही मार्गावर ठरावीक काही मिनिटांनी सोडण्यात येत आहेत. पीएमपीच्या या योजनेला प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध मार्गावर या गाडय़ांतून दैनंदिन सतरा ते अठरा हजार नागरिक प्रतिदिन प्रवास करत आहेत. त्यातून पीएमपीच्या उत्पन्नालाही हातभार लागला आहे.

प्रवाशांचा योजनेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येताच नगरसेवकांनी लोकापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या सोयीचे मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू के ला आहे. स्थानिक नगरसेवक, मतदारसंघाचे आमदार यांच्या उपस्थितीत असे मार्गही सुरू झाले आहेत. नगरसेवकांच्या मागणीनुसार अनेक सोसायटय़ां, मार्गातील मोठी ठिकाणे असे थांबे या गाडय़ांना देण्यात आले आहेत. कोथरूड, सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी, मार्के टयार्ड, कोथरूड डेपो, रामनगर, स्वारगेट, डेक्कन, औंध, सिंहगड किल्ला,संगमवाडी, मंडई, सिंबायोसिस विद्यापीठ, राजस सोसायटी अशा भागात पीएमपीचे नवे मार्ग स्थानिक नगरसेवकांनी सुरू करून घेतले आहेत. याचबरोबर डेक्कन, मार्के टयार्ड, पुणे स्थानक अशा भागांतून ग्रामीण हद्दीमध्येही काही मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाख प्रवासी पीएमपीतून दैनंदिन प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात अपुऱ्या गाडय़ा आहेत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. येत्या वर्षांअखेपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात एकू ण विविध प्रकारच्या ५०० गाडय़ा टप्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामध्ये विजेवर धावणाऱ्या गाडय़ांपासून मध्यम आकाराच्या गाडय़ांचाही समावेश आहे. गाडय़ांची संख्या अपुरी असताना नगरसेवकांनी त्यासाठी कधी पाठपुरावा के ल्याचे दिसून आले नव्हते.यापूर्वीही अनेकदा प्रवाशांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी वेगवेगळे मार्ग सुचविले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेली महापालिके ची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगरसेवकांचा खटाटोप सुरू झाल्याची वस्तुस्थिती आहे.

दहा रुपयांत दिवसभर प्रवास एप्रिलपासून

दहा रुपयांमध्ये पीएमपीचा दिवसभर प्रवास अशी योजना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अंदाजपत्रकात प्रस्तावित के ली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यम आकारच्या ५० गाडय़ांची खरेदी करण्यात येणार आहे. गाडय़ा खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून एप्रिल महिन्यापासून मध्यवर्ती भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पाठपुरावा सुरू झाला आहे.