पुण्यातील बिबवेवाडी येथे बालदिनी अनर्थ टळला आहे. बाल दिनाचा कार्यक्रम सुरु असताना अंगणवाडीत आग लागल्याची घटना घडली असून सतर्क शिक्षकाने वेळीच सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून यात अंगणवाडीतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

बिबवेवाडीतील तीन हत्ती चौकातील विष्णू उर्फ आप्पा जगताप क्रीडा संकुलात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडी क्र. १३९ मध्ये बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे समजताच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर नेले आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत अंगणवाडीतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आग लागली त्यावेळी तिथे दहा विद्यार्थी उपस्थित होते.