पुणे : फळभाज्या, धान्य, तेल, डाळी, पेट्रोल अशा जीवनोपयोगी वस्तूंच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे सामान्य होरपळले जात आहेत. येत्या सोमवारपासून (१ मार्च)पासून दळणाच्या दरातही वाढ होणार आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वीज दरवाढीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील पीठ गिरणीचालकांकडून दळणाच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या (१ मार्च) ही दरवाढ लागू होणार असून सात रुपये प्रतिकिलो या दराने गहू, ज्वारी, बाजरीचे दळण मिळणार आहे. त्यामुळे संसाराचे अंदाजपत्रक मांडणाऱ्या गृहिणींना १ मार्चनंतर दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. शहरातील पीठ गिरणीचालकांनी पाच वर्षांनंतर दळणाच्या दरात वाढ केली असल्याची माहिती पुणे शहर-जिल्हा पीठ गिरणी मालक संघाकडून देण्यात आली. पीठ गिरणीचा समावेश औद्योगिक श्रेणीत होतो. त्यामुळे शहरातील पीठ गिरणीचालकांकडून दरमहा औद्योगिक श्रेणीनुसार वीजदेयक आकारले जाते. गेल्या पाच वर्षांत वीजदरवाढ तसेच पीठ गिरणी साहित्यात दरवाढ झाली होती. मात्र, पीठ गिरणीचालकांकडून दळणाच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पुणे शहर-जिल्हा पीठ गिरणी मालक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संघटनेचे अध्यक्ष लुईस सांगळे, सचिव प्रकाश कर्डिले, राजू चांदेकर, अमोल मेमाणे, प्रमोद वालेकर, नरहरी खराडे, प्रेम राठोड, शिवाजी ठकार, गणेश गोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते दळणाच्या दरात एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दळणाच्या दरात १ मार्चपासून एक रुपयांनी वाढ केली जाणार असून नव्या दरानुसार आता एक किलो दळणाचा दर ७ रुपये असा राहील. सध्या सहा रुपये किलो या दराने दळून दिले जाते, असे सांगळे आणि कर्डिले यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत पीठ गिरणीचालकांकडून कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. महावितरणकडून दर वाढविण्यात आले असले तरी पीठ गिरणी चालकांनी वाढ केली नव्हती. पीठ गिरणीचा समावेश औद्योगिक श्रेणीत होतो. त्यामुळे औद्योगिक श्रेणीनुसार वीजदेयक आकारले जाते. ग्रामीण भागात शेतकरी पीठ गिरणीचा व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून करतात. त्यामुळे पीठ गिरणीचालकांचा औद्योगिक श्रेणीत समावेश करू नये, अशी आमची मागणी होती. पीठ गिरणीतील यंत्रात दहा एचपी (अश्वशक्ती) मोटारीचा वापर केला जातो. पीठ गिरणीचालकांकडून औद्योगिक श्रेणीनुसार देयक आकारले जाते. पीठ गिरणी व्यवसायाचा कृषीपूरक ओळखला जावा, ही आमची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे सातत्याने काणाडोळा करण्यात आला असे सांगळे आणि कर्डिले यांनी नमूद केले. राज्यात १ लाख ६० हजार पीठ गिरण्या महाराष्ट्रात १ लाख ६० हजार पीठ गिरण्या आहेत. पीठ गिरणी व्यवसायाचा समावेश कृषीपूरक व्यवसायात करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पीठ गिरणी महासंघाकडून वेळोवेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पीठगिरणीचा पूरक व्यवसाय करतात. शहरी भागात पीठ गिरणी व्यवसाय करणे परवडणारे नाही. गिरणीसाठी जागा, वीजदेयक, कामगारांचे वेतन या बाबी विचारात घेतल्यास पीठ गिरणीचालकांकडून दरवाढ करण्यात आली आहे. याबाबत आम्ही पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून पीठ गिरणीचा व्यवसाय कृषीपूरक व्यवसायात करावा, असे निवेदन देणार आहोत, असे पीठ गिरणी मालक संघटनेचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी सांगितले.