करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने करोनाचा संसर्गाचं प्रमाणात नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना ही सूट दिली आहे. तर ११ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पुणे शहर आणि जिल्ह्याचाही समावेश असल्यानं सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सरकारने मुंबईतील निर्बंध शिथिल केलेले असताना पुण्यात का कायम ठेवले? असा सवालही केला जात असून, याच मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आपलं नवीन गाणं येत असल्याचीही घोषणा केली.

अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, पुण्यात बाधित रुग्णांचा दर ४ असून, तरी देखील मॉल्स आणि इतर सर्व बंद ठेवण्यात आलं आहे. नागरिकांना चारपर्यंतची वेळ पुरेशी नाही. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. वेळ अधिकची देण्यात आली असती, तर नागरिकांनी गर्दी केली नसती. मात्र नागरिकांनी नियम पाळून खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसेच मुंबईत डेथ रेट अधिक असतानाही तिथे एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? त्यामुळे प्रशासनाने जागं होण्याची गरज असून, नागरिकांनी धरणं आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. तसेच एक धोरण तयार करून आता पुण्यात अधिक मोकळीक देण्याची वेळ आलेली आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

युतीबद्दल मोदी-शाह यांच्याशी चर्चा करून सांगते -अमृता फडणवीस

यावेळी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता कोणत गाणं येणार आहे अशी विचारणा करण्यात आली असता, अमृता फडणवीस म्हणाल्या, “गणेश चतुर्थीच्या आधी माझं एक गाणं येणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना गाणं सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस (स्टेजकडे बोट करीत) म्हणाल्या, “मी तिथे म्हटलं असतं, इथं ही वेळ नाही. तुम्ही मला एकदम सिरीयस प्रश्न विचारता आहात. पुढील वेळी हलकं फुलकं विचाराल, तेव्हा बघू… पुढच्या वेळी १०० टक्के नक्की”, असं त्यांनी सांगितलं.