गोठ्याची भिंत कोसळून बळीराजाच्या कुटुंबाचा कणा असलेल्या दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना मावळ परिसरात घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये सतत पाऊस कोसळत असून आज पहाटेच्या सुमारास गोठ्याची भिंत पडून त्याखाली दबून बैलांचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे बैलाचे मालक शेतकरी विठ्ठल जगताप यांना अश्रू अनावर झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मावळ मधील प्रभाची वाडी येथे घडली आहे. पिंट्या आणि बबड्या असं या बैलजोडीचं नाव आहे. मावळमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असून विठ्ठल जगताप यांनी पिंट्या आणि बबड्या या बैलजोडीला आपल्या गोठ्यात बांधले होते. दररोज प्रमाणे त्यांनी चारापाणी करून ते घरी निघून गेले. परंतु, आज पहाटेच्या सुमारास गोठ्याची भिंत कोसळली आणि त्याखाली दबून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी विठ्ठल जगताप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पांढऱ्या शुभ्र बैल जोडीला गोंजारून ते गहिवरले. कोणताही शेतकरी बैल म्हटलं की आपल्या पोटच्या मुलापेक्षा जास्त जपत असतो. तसंच, जगताप यांनी पिंट्या आणि बबड्याला जपलं होतं. परंतु, आज पहाटे त्यांच्यावर काळाने घाला घातला, ज्यात त्यांचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला आहे. विठ्ठल जगताप यांचं आर्थिक नुकसान तर झालंच, शिवाय कुटूुंबातील सदस्य गेल्याचं दुःख असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.