पुण्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहमधील एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीस काल(सोमवार) दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे. अग्नितांडवाच्या या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून, सर्वस्तरातून शोक व्यक्त होत आहे. तर, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या आरोपावरून कंपनीचा मालक निकुंज शहा यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा  यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली गेली आहे.

पुणे : केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

काल या दुर्घटनेनंतर घटनास्थळी नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा प्रचंड आक्रोश पाहण्यास मिळाला. तेथे उपस्थित असलेल्या काहींनी सांगितले की, या कंपनीत आठ दिवसांपूर्वीच एक छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हाच काळजी घेण्याची गरज होती. जर तेव्हाच काळजी घेतली गेली असती, तर आज अशी दुर्घटना घडली नसती. आमची माणसं नाहक गेली नसती. तसेच, कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली होती.

Pune MIDC Fire : आगीचं क्रौर्य! ‘त्या ’ १८ जणांची ओळखही पटेना

दरम्यान, आगीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune MIDC Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर!

पिरंगुट येथील भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजारांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे.