बुधवार रात्री पडलेल्या मुसळाधार पावसामुळे पुणेकरांचे जनजिवन विस्कळीत झाले. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. अरणेश्वर कॉर्नर, टांगेवाला कॉलनी भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. मात्र या नागरिकांसाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नाही असा आरोप करीत येथील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन केले. आंदोलनानंतर पुण्यातील पोलीस अधिकार्‍यांनी कचरा बाजूला केला.

पावसाने विश्रांती घेऊन २४ तास उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही मदत पोहचली नाही. प्रामुख्याने कचरा उचला गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व कचरा चौकात आणून टाकत आंदोलन केले. हे आंदोलनकर्त्यांची समजूत काढत मागे घेण्यात दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास गेवारे यांना यश आले.

देवीदास गेवारे एवढ्यावर न थांबता, त्यांनी चौकात पडलेला कचरा स्वतः बाहेर काढण्याचे काम केले. या वर्दीमधील व्यक्तीने कचरा काढत असल्याचे पाहून नागरिक देखील सहभागी झाले. या त्यांच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले.

यावर दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास गेवारे म्हणाले की, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरणेश्वर आणि टांगावाले कॉलनी परिसराला सर्वाधिक फटका बसला. या भागातील प्रत्येक नागरिकांच्या आम्ही संपर्कात आहोत. प्रशासनाकडून कचरा उचला नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी तो कचरा रस्त्यावर टाकून आंदोलन केले. या सर्व आंदोलन कर्त्याची समजूत काढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनासोबत संपर्क करून कचरा काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

वीज, पाणी, गॅसविना नागरिकांचे हाल

बुधवारी रात्री धुवाधार पावसामुळे काही ठिकाणी वीजयंत्रणा वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वीजयंत्रणा पाण्याखाली गेल्याने बुधवारी रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत वीज पूर्ववत झाली नव्हती. त्यामुळे सोसायटय़ांना इमारतीवरील टाक्यांमध्ये पाणी चढविता न आल्याने पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वीज नसल्याने चार्जिगअभावी मोबाइल संचही बंद पडले. बिबवेवाडी आणि सिंहगड रस्ता भागामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या गॅस वाहिन्यांचे नुकसान झाल्याने या भागातील गॅस पुरवठाही बंद होता.