बारामती तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला. यामध्ये जवळपास ३१२ किलो गांजा जप्त केला आहे.  भरधाव पावसात बारामती पोलिसांनी पाटस-बारामती मार्गावर टॅम्पो (एमएच.१०. सीआर. ४३२६) पकडून ही मोठी कारवाई केली आहे. यातील चार अरोपींना अटक केली आहे.

प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसारसातारा, सांगली जिल्ह्यात विक्री करण्यासाठी विशाखापट्टणम येथून , ३१२ किलो गांजा येणार होता. याची माहिती मिळाल्याने पुणे ग्रामिण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पण, इतके करुनही टेम्पो निघुन गेला. त्यावेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी कारमधुन टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला. अन् गांजा अन् आरोपींना अटक केली. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलं आहे.


विजय जालिंदर कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) , विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.