जदतगतीने काम पूर्ण करण्याची गडकरी यांची ग्वाही

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे केवळ १२ किलोमीटर रुंदीकरणाचे काम बाकी आहे. तेथील कामे जलदगतीने सुरू असून येत्या ५ डिसेंबपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील, अशी अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना सर्वाधिकार देण्यात आले असून ते याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रखडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी (३१ मे) प्रसिद्ध केले होते. त्याचा संदर्भ गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिला आणि रखडलेली कामे डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी सातारा रस्ता रुंदीकरणाच्या कामाबद्दल भाष्य केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत दोन वर्षांपूर्वी पुण्यात गडकरींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा त्यांनी केली होती. रुंदीकरणाचे काम २०१० पासून सुरू होऊन २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही कामे सुरूच आहेत. तसेच ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे.

या पाश्र्वभूमीवर गडकरी म्हणाले, पुणे-सातारा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची किंमत १७२५ कोटी रुपये असून लांबी १४०.३५ कि. मी. एवढी आहे. त्यातील १२८.३० कि. मी.चे सहापदरीकरण करायचे असून या कामामधील १२ कि. मी. सोडल्यास उर्वरित काम पूर्ण झालेले आहे. या १२ कि. मी. मधील रस्ते जोडणी आणि बांधणीचे (स्ट्रक्चर) काम बाकी आहे. त्यामध्ये एकूण ६२ स्ट्रक्चर असून त्यातील ४७ पूर्ण झाली आहेत. तर चालू दहा स्ट्रक्चर ऑक्टोबपर्यंत पूर्ण होतील.

एनएचएआय आणि रिलायन्समधील करार काँग्रेस सरकारच्या काळात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे-सातारा रस्त्याच्या कामासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) आणि रिलायन्समध्ये झालेला करार काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे काम आम्ही रिलान्यसला दिलेले नाही. या कामात असंख्य अडचणी आल्या असून दिल्लीमध्ये मी स्वत: अनेक बैठका घेतल्या आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम अलीकडेपर्यंत सुरू होते. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव, सातारा प्रशासन यांनी प्रयत्न करून जवळपास सर्व भूसंपादन पूर्ण केले आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.