महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी लसींसंदर्भात महाराष्ट्राला प्राधान्य द्यावं अशी मागणी केली आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पाटील यांनी ही मागणी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपा काय काय उपाययोजना करत आहे यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी भाजपा नगरसेवकांकडून कशापद्धतीने रुग्णालयांमध्ये बेड्सची सुविधा पुरवली जात आहे याबद्दलची माहिती दिली. पत्रकार परिषदेनंतर सीरमसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी, "याबद्दल बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. यासंदर्भातील उत्तर सीरम देऊ शकेल," असं सांगितलं. पुढे पत्रकारांनी त्यांना 'सीरम महाराष्ट्रात आहे आणि पुनावाला कुटुंबाकडे त्याचा कारभार आहे तर.' असं विचारलं असता, "मी एवढंच पुनावाला यांना आवाहन करु शकतो की त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया दिली. आणखी वाचा- Remdesivir : “महाराष्ट्राला २ लाख ६९ हजार इंजेक्शन मिळाली तर ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरड होतोय त्यांना…” पुण्यामधील रुग्णालयांच्या बेड्सची संख्या वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. आम्ही पुण्यातील प्रत्येक भाजपा नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या प्रभागातील एखाद्या कोव्हिड सेंटरमध्ये जमेल तेवढ्या बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे. आम्ही या केंद्रांना बेड्स आणि इतर सुविधा देऊ. करोना काळानंतर त्या गोष्टी पक्षाकडून रुग्णालयांना भेट म्हणून कायम स्वरुपी वापरण्यासाठी देण्यात येतील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. अशाप्रकारे गुरुवारी आपण पुण्यात तीन रुग्णालयांमधील नवीन बेड्सच्या कक्षांचं उद्घाटन केल्याचं पाटील म्हणाले. नगरसेवक असणाऱ्या रायगुडे यांनी ४५ बेड्स, मनिषा कदम यांनी ३० बेड्स, मंजुषा नागपुरे यांनी २५ बेड्सची सुविधा उपलब्ध करुन दिलीय. मी संजीवनमध्ये ४० बेड्स देणार असल्याचं कळल्याने त्यांनी स्वत:हून ३० बेड्स वाढवल्याने तिथे आता ११० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. आणखी वाचा- ३५० कोटी रुपये पोत्यात भरुन अजितदादांच्या टेबलवर टेकवा आणि म्हणा… : चंद्रकांत पाटील आज एका वृत्तपत्रामध्ये आमदार, नगरसेवक कुठे गेेल असा लेख छापून आलाय. वृत्तपत्रांना ते स्वातंत्र्य आहे. पण जी कामं केली जात आहेत त्याबद्दल पण लिहा. प्रसिद्धीसाठी नाही तर लोकांचा विश्वास वाढेल म्हणून तरी त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहचू द्या, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना केलं. सकारात्मक बातम्या शेअर करण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने एक डॅशबोर्ड सुरु केल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.