भाजपकडून ताकद पणाला; काँग्रेसकडूनही वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
प्रभाग क्रमांक १८ : खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ

अत्यंत दाटीवाटीचा, मध्यमवर्गीय आणि सर्व भाषक समाजाचे प्राबल्य असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ (प्रभाग क्रमांक १८) या प्रभागात नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही येथे काँग्रेसला मतदारांनी ‘हात’ दिल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील अपवाद वगळता या प्रभागात काँग्रेस वा अन्य पक्षांनाच यश मिळाले आहे. या विधानसभा मतदार संघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आमदार गिरीश बापट हे आता जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाजपने या प्रभागात ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर या प्रभागात वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्नांची पराकाष्ठा होणार आहे.

सध्याचा प्रभाग क्रमांक ४९, ५८, ५९ आणि ६५ चा काही भाग मिळून नवीन खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ हा प्रभाग तयार झाला आहे. भाजपच्या व काँग्रेसच्या तीन आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा प्रभाग या नव्या प्रभागरचनेत जोडण्यात आला आहे. ही रचना करताना अनुकूल प्रभाग केल्याचा आरोप भाजपवर होत आहे. मात्र प्रभागातील सामाजिक रचना लक्षात घेतली तर मुस्लीम आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या अधिक आहे. शिवसेना आणि भाजपची स्वबळावर लढण्याची भाषा सुरू झाली आहे. त्याचा फटकाही भाजपला बसण्याची शक्यता असून गेल्या निवडणुकीत मतदारांनी या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही पसंती दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रभाग रचना भाजपला अनुकूल असल्याची चर्चा असली, तर मतविभागणीमुळे बसणारा फटका विचारात घेता भाजपचे उमेदवार स्थानिक मतदारांवर कितपत प्रभाव टाकू शकतील त्यावर त्या पक्षाचे यश अवलंबून आहे.

अत्यंत दाटीवाटीच्या भौगोलिक रचनेमुळे सार्वजनिक आणि सामाजिक सुविधा पुरविण्यात येत असलेल्या अडचणींमुळे शहराच्या अन्य भागांच्या तुलनेत हा परिसर आतापर्यंत अविकसित राहिला आहे. जुन्या वाडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा रस्ता रुंदीकरण तसेच सार्वजनिक स्वच्छता असो येथे कायमच अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे येथील निवडणुकांचा सर्वाधिक कल हा सामाजिक व नागरी प्रश्न आणि नगरसेवकांचा वैयक्तिक संपर्क यावरच अवलंबून आहे. राजकीय पक्ष कोणाला उमेदवारी देणार आहेत, यावरही प्रभागातील निवडणुकीचा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या प्रभागात नगरसेविका आणि माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक मिलिंद काची, संजय बालगुडे हे विद्यमान नगरसेवक इच्छुक असून भाजपकडून नगरसेवक विष्णू हरिहर, प्रतिभा ढमाले यांची चर्चा आहे.

या कामांचे काय?

* गोरगरिबांसाठी स्वस्तात घरे देणारी ‘घरकुल’ योजना जाहीर केली, ती अध्र्यातून गुंडाळण्यात आली. दीड लाखांचे घर पावणेचार लाखांवर नेण्यात आले. अनेक पात्र लाभार्थी वंचित राहिले, बोगस नागरिकांची घुसखोरी झाली. पुनर्वसन प्रकल्प सुरू झाले, मात्र  राजकारणामुळे  बोजवारा उडाला.

* मावळ गोळीबारानंतर बंदनळ योजनेचे काम बंद पडले, ते अद्याप सुरूच होऊ शकले नाही. ठेकेदाराच्या घशात मात्र कोटय़वधी रुपये घालण्याचा ‘उद्योग’ संगनमताने करण्यात आला.

* शहरासाठी स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा करून नियोजनबद्ध विकास करण्यात येणार होता, मात्र, सुभेदारांच्या टक्केवारीच्या वादात त्याचे ‘तीन तेरा’ वाजले.

* ‘२४ तास पाणीपुरवठा’ करण्यात येणार होता, त्याचे भवितव्य अंधारमय आहे.

* निविदांचा घोळ सुरू असून नगरसेवक, अधिकारी व ठेकेदार यांच्यात संयुक्तपणे ‘खाबुगिरी’चेच काम सुरू आहे.

* १९९७ पासून तळवडय़ात ‘हरीण उद्यान’ सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ‘कागदी घोडे’ नाचवण्याशिवाय काहीही झालेले नाही.

*   आकुर्डीतील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले नाही.