पहिल्या फेरीमध्येच महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ निव्वळ १ गुणापर्यंत

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या वाढल्यामुळे संस्थांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी यंदा गुणवत्तेची टंचाईच आहे. काही महाविद्यालयांचा पहिल्याच फेरीचा कट ऑफ एका गुणापर्यंत खाली घसरला आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत १० पेक्षा कमी गुण मिळालेल्या ७६ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत प्रवेश मिळाला आहे.

या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी या प्रवेश प्रक्रियेत ‘गुणवत्ता’ ही संकल्पनाच संपुष्टात आल्याचे दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी प्रवेश परीक्षेत १ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला होता. या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाने ही परंपरा राखली आहे. सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) दोनशेपैकी १ गुण  मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. एक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांला प्रवेश देण्याची वेळ आलेले एक महाविद्यालय गोंदिया येथील तर दुसरे नागपूर येथील आहे. अनेक महाविद्यालयांचे कट ऑफ गुण पहिल्याच फेरीत दहा गुणांच्याही खाली घसरले आहेत. दहा किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या ७६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे.

दहापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २७ विद्यार्थ्यांना नागपूर येथील महाविद्यालये मिळाली आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, मिरज, सातारा, जळगाव, परभणी, वर्धा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, कोल्हापूर आणि वाशिम येथील महाविद्यालयांचे कट ऑफ गुण दहा गुणांखाली घसरले आहेत.

 

पहिल्या फेरीची स्थिती

  • केंद्रीय प्रवेशाची क्षमता – १ लाख ३८ हजार
  • आलेले अर्ज – १ लाख २ हजार
  • पहिल्या फेरीत दिलेले प्रवेश – ८१ हजार

मिळालेले प्रवेश (कंसात विद्यार्थीसंख्या)

१ गुण (२), २ गुण (५), ३ गुण (३), ४ गुण (६), ५ गुण (१३), ६ गुण (९), ७ गुण (२), ८ गुण (९), ९ गुण (८), १० गुण (२०)

 

अभियांत्रिकी प्रवेशाला किमान गुणांची अट नाही. सामायिक प्रवेश परीक्षेत शून्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात. चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांचा पर्याय दिलाच नसेल अशा महाविद्यालयांना खूप कमी गुण मिळालेले विद्यार्थी मिळतात. मात्र या विद्यार्थ्यांना बारावीला किमान ५० किंवा ४५ टक्के गुण आहेत.

– दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षणविभाग