पुण्याजवळील मुळशी, ताम्हिणी घाट, कोलाड ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे! एरवी मे अखेरीपासूनच गजबजू लागणाऱ्या या ठिकाणांना या वर्षी मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. गेला आठवडाभर झालेल्या पावसाने आता हळूहळू पर्यटकांची वर्दळ सुरू झाली असली, तरी या ठिकाणी असलेली कॉटेजेस, हॉटेल्स यांचा जून महिन्यात झालेला व्यवसाय तब्बल पन्नास टक्क्य़ांनी कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मे अखेरीपासून वळीवाचा पाऊस सुरू झाला की पावसासाठी पर्यटनाचे बेत बनू लागतात. पुण्याजवळील मुळशीचा भाग ते ताम्हिणी घाट, कोलाडचा कुंडलिका नदीचा भाग ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे. धरणाचा भाग, धबधबे, पावसाळी कीटक, पक्ष्यांची घरटी, रानफुले यामुळे पर्यटकांना या भागाचे विशेष आकर्षण आहे. पर्यटकांची हौस भागवण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी हॉटेल्स, कॉटेजेसही सुरू केली आहेत.
या वर्षी मात्र या व्यावसायिकांचा जून महिना पर्यटकांची वाट पाहण्यातच गेला. दरवर्षीपेक्षा यावर्षी जवळपास पन्नास टक्क्य़ांनी उलाढाल कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दरवर्षी एका महिन्यात एका कॉटेज किंवा हॉटेलची उलाढाल ही साधारण दीड ते दोन लाखांच्या घरात होते. मात्र, या वर्षी उलाढाल घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. एरवी जून महिन्यात प्रत्येक कॉटेजला सरासरी २०० ते २५० पर्यटक भेट देतात. मात्र, या वर्षी ही संख्या शंभरच्या जवळपास असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोदवले आहे. जवळपास संपूर्ण जून महिन्यामध्ये एकही धबधबा वाहू लागला नाही. धरणाची पातळीही खालावल्यामुळे पर्यटकांचा विरस झाला. मात्र, गेला आठवडाभर झालेल्या पावसाने व्यावसायिकांना जरा दिलासा दिला आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या पावसाने पर्यटकांची पावले आता पुन्हा मुळशीकडे वळू लागली आहेत.

‘दरवर्षी या भागामध्ये होणाऱ्या एकूण उलाढालीपैकी साधारण ४० ते ५० टक्के उलाढाल ही जून-जुलै महिन्यात होते. मात्र, या वर्षी ही उलाढाल २० ते ३० टक्क्य़ांपर्यंत कमी होईल असे दिसते आहे. आता पाऊस सुरू झाला असला, तरी पर्यटकांना आकर्षण असलेले बहुतके धबधबे अजूनही वाहू लागलेले नाहीत. त्याचप्रमाणे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी पर्यटकांची अधिक गर्दी असते. आता पाऊस सुरू झाला असला, तरी सण-उत्सवही सुरू होतील. त्यामुळे पर्यटकांचा ओढा कमीच राहू शकेल.’
– प्रवीण चव्हाण, व्यावसायिक

‘जून महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा कमीच असतो. मात्र, त्यानंतर तो हळूहळू वाढत जातो. यावर्षी पर्यटक कमी आहेत. मात्र, आता पाऊस सुरू झाल्यामुळे आणि येत्या काळात सुट्टय़ा असल्यामुळे व्यवसायावर खूप परिणाम होणार नाही असे वाटते.’
– राजेंद्र गांधी