पहिल्या पावसात दुचाकी चालवताना दक्षता घ्यावी हे खरेच, पण तुम्ही जर पर्जन्य वृक्ष लावलेल्या रस्त्यावरून गाडी चालवत असाल तर विशेष काळजी घेण्याचा सल्ला वृक्ष अभ्यासकांनी दिला आहे. पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), रिठा आणि ऑस्ट्रेलियन बाभूळ या झाडांच्या शेंगा, फळे आणि बियांमध्ये साबणसदृश पदार्थ (अल्कली) असून रस्त्यावर पडून त्यावर चिकटून बसलेल्या शेंगांवर सुरुवातीच्या पावसाचे पाणी पडल्यावर रस्त्याच्या कडेला फेस निर्माण होत असल्याचे पहिल्या पावसात दिसून आले आहे. या फेसावरून गाडय़ा घसरण्याची शक्यता असून यापुढे पडणाऱ्या पहिल्या पावसात अशा फेसावरून गाडी चालवताना जपायला हवे, असे निरीक्षण ‘बायोस्फीअर्स’ या संस्थेचे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी नोंदवले.बीएमसीसी महाविद्यालयासमोरील रस्ता, जंगली महाराज रस्ता, प्रभात रस्ता, नीलायम टॉकिजसमोरून सारसबागेकडे जाणारी गल्ली या ठिकाणी पहिल्या पावसानंतर वृक्षांच्या शेंगांमुळे रस्त्यावर फेस निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्जन्य वृक्षालाच ‘रेन ट्री’ किंवा ‘शिरिष खोटे’ असेही म्हणतात. हा देशी वृक्ष नसून तो मूळचा दक्षिण अमेरिकेतून आलेला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात या वृक्षाला फुले येतात, तर पावसाळ्यात त्याच्या शेंगांचा सडा पडतो. - ‘मी स्वत: या फेसवरून पडलो आहे. पर्जन्य वृक्षाच्या शेंगा चिकट असल्यामुळे त्यावरून गाडय़ा गेल्यावर त्या रस्त्याला चिकटून राहतात. सुरुवातीच्या पावसात या शेंगांवर पाणी पडून फेस निर्माण होणे टाळण्यासाठी शेंगा पडल्यावर त्या उचलून टाकणे गरजेचे आहे.’ - डॉ. सचिन पुणेकर, वृक्ष अभ्यासक तळजाईवर वाढतेय विषारी गराडी! पाचगाव पर्वती भागात तळजाई पठारावर फिरायला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आवळ्यासारखी दिसणारी झाडे लावली गेली आहे. पण ही झाडे प्रत्यक्षात आवळ्याची नसून ती आवळा कुळातलीच विषारी गराडी आहे. ‘आवळा समजून या गराडीची फळे लहान मुले, माकडे, मोर किंवा सशांकडून खाल्ली जाण्याची शक्यता असून फळ विषारी असल्याने ते त्रासदायक ठरू शकते,’ असे पुणेकर यांनी सांगितले. गराडी हे स्थानिक झाड नाही. ते प्रामुख्याने भंडारा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली या भागात आढळते, असेही त्यांनी सांगितले.