राजा परांजपे यांचे चित्रपट आजच्या चित्रपटसृष्टीचा पाया आहे. चित्रपटांमधील ज्या नसíगक अभिनयाबद्दल बोलले जाते, त्याची सुरुवात राजाभाऊंच्या चित्रपटांपासून झाली, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी गुरुवारी व्यक्त केले. राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होत्या. अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, युवा गायक स्वप्नील बांदोडकर आणि नवोदित दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना कार्यक्रमात सुहास जोशी यांच्या हस्ते राजा परांजपे सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. शर्वरी जमेनिस यांच्या स्वरलयाकृती या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमात अभिनेते प्रवीण तरडे यांनी सर्व सन्मानार्थी आणि सुहास जोशी यांची मुलाखत घेतली. राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीव होत आहे असे मनोगत स्वप्नील बांदोडकर यांनी व्यक्त केले. कोणतेही अत्याधुनिक तंत्र हातात न घेता राजा परांजपे यांनी तयार केलेल्या चित्रपटांना तोड नाही, असे सचिन खेडेकर यांनी सांगितले. कुठल्याही चित्रपटाची निर्मिती सांघिक असते. प्रेक्षकांना नट दिसतो पण त्याच्या मागे अनेक गोष्टी असतात. चित्रपटाच्या यशाचे श्रेय सर्वाचे असते. मराठी प्रेक्षकांनी आपली अभिरुची जपून ठेवल्यामुळे या चित्रपटांना सफलता मिळाली, असेही ते म्हणाले. मुलाखतीत ‘काकस्पर्ष’ आणि ‘रेगे’ सारख्या गंभीर चित्रपटांच्या सफलतेविषयी विचारल्यावर अभिजीत पानसे यांनी नव्या विषयांची मराठी चित्रपटसृष्टीला आवश्यकता आहे असे सांगितले. नवीन तंत्राबद्दल सुहास जोशी यांनी सांगितले की, पुढच्या पायरीवर जाताना चित्रपटांचा तंत्राच्या माध्यमातून जो प्रवास होत आहे त्या बदलातून बाहुबलीसारखे चित्रपट आले. परंतु यामुळे कलाकारांच्या नसíगक अभिनयाला धक्का पोहोचणार नाही याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.