‘आंबा स्वस्त झालाच कसा?’ याचा शोध घेण्यासाठी शासनाने समिती नेमली असली, तरी पुण्यातील आडत व्यापाऱ्यांच्या मते या प्रश्नाची स्पष्ट उत्तरे आहेत. मार्चपर्यंत लांबलेली थंडी, आंब्याच्या दोन मोहोरांची एकदम तयार झालेली फळे तसेच, वाढलेले तापमान, वादळी पाऊस यामुळे धास्तावलेल्या उत्पादकांनी वेळेआधीच केलेली आंब्यांची तोड.. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून एप्रिलच्या अखेरीपासून बाजारात आंब्याची दुपटीने वाढलेली आवक या कारणांमुळे आंब्याचे भाव गडगडल्याची कारणमीमांसा पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमधील आंबेव्यापाऱ्यांनी केली.आंब्याच्या दराच्या ‘पडझडी’चा छडा लावण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. युरोपीय महासंघाने १ मे पासून हापूस आंब्याला प्रवेश बंदी केली आणि तेव्हापासूनच राज्यभरातील बाजारपेठांमध्ये आंब्यांचे भाव उतरायला लागले. परंतु राज्यातून युरोपात जाणाऱ्या आंब्याची निर्यात केवळ ३ टक्केच असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दर कोसळलेच कसे असा प्रश्न शासनाला पडला आहे.नेमके काय घडले?गुलटेकडी येथील आडत व्यापारी सुहास ढमढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंब्याच्या झाडांना सप्टेंबर-ऑक्टोबर, डिसेंबर-जानेवारी आणि फेब्रुवारी असा तीन वेळा मोहोर येतो. या वर्षी थंडी मार्चपर्यंत टिकली. तसेच तिसऱ्या मोहोराच्या आंब्याला फलधारणा खूप मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मोहोराचा आंबा एकत्र आला. एप्रिलच्या शेवटी व मे च्या सुरुवातीस तापमान ३८ अंश सेल्सियसच्या पुढे जाऊ लागले होते. ३८ अंशांच्या पुढे तापमान गेल्यास हापूस आंबा भाजतो आणि बिलबिलित होतो. तसेच एप्रिलच्या २४ ते २९ तारखांच्या दरम्यान अवकाळी पाऊसही झाला. हवामानाच्या कारणांमुळे उत्पादकांनी कोवळा आंबा घाईने तोडला आणि बाजारात पाठवून दिला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, राजापूर, संगमेश्वर, जयगड खाडी, गुहागर, खेड, दापोली, चिपळूण, मंडणगड, रायगड, श्रीवर्धन मसला, तोराडी, पांगरोली, संदिरी या सर्व तालुक्यात हीच परिस्थिती राहिली. मार्केट यार्डातील परिस्थिती पाहता २५ एप्रिलपासून आंब्याच्या पेटय़ांची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली असून अजूनही ही आवक सुरूच आहे. याचीच परिणती आंब्याचे भाव ढासळण्यात झाली. ‘बाजार समिती निष्क्रिय; व्यापाऱ्यांना चौकशीचा त्रास’बाजार समिती आंबे उत्पादकांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसून आता आंबे स्वस्त होण्यावरून व्यापाऱ्यांच्या मागे निष्कारण चौकशीचा ससेमिरा लागणार असल्याचे मत ढमढेरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांत आंब्याची आवक एवढी वाढून भाव पडण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. असे भाव पडल्यावर कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने हस्तक्षेप करून माल खरेदी करावा व देशातील इतर बाजारपेठात पाठवावा किंवा माल प्रक्रिया करण्यास पाठवावा अशी तरतूद आहे. राज्यातील बाजार समित्यांनी त्याची पूर्तता कधीही केली नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकवण्यासाठी राइपनिंग चेंबर, साठवण्यासाठी शीतगृह, निर्यातीसाठी आंबा तयार करण्यास लागणारी न्यूक्लिअर रेडिएशन यंत्रणा, हॉट वॉटर व्हेपर यंत्रणा तसेच पॅकेजिंग व ग्रेडिंग यंत्रणा आंबाविक्रेत्यांच्या मागण्या गेली दहा वर्षे पूर्ण झालेल्या नाहीत. उलट आता आंबा स्वस्त होण्यावरून व्यापाऱ्यांचीच चौकशी करून त्यांना नाहक त्रास दिला जाणार आहे.’’ मार्केट यार्डमध्ये आंब्यांचे सध्याचे भाव :चार डझनांच्या पेटीसाठी- ५०० ते ८०० रुपयांपर्यंत. काही ठिकाणी ते १००० रुपयांपर्यंत आहेत.