ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे मत गट-तट, स्पर्धा आणि कंपूशाही यामुळे साहित्यविश्व संकुचित होत आहे. चांगल्या कामाची दखल घेतली जाणे दुरापास्त झाले आहे. समीक्षणात साक्षेप राहिला नसून, वाचकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मराठीची अवस्था काळजी करण्याजोगी झाली आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते प्रभा गणोरकर यांच्या ‘मराठीतील स्त्रियांची कविता’ या संशोधनपर ग्रंथाला कृष्ण मुकुंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे माजी ग्रंथालय संचालक कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोहन गुजराथी आणि प्रा. नलिनी गुजराथी यांनी परिषदेला दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, सुधीर उजळंबकर, मुकुंद उजळंबकर या वेळी उपस्थित होते. कवयित्रींचे साहित्य प्रकाशित होण्याचा वेग वाढला असला तरी तेच ते परत लिहिले जाते आहे का आणि आधीच्या काळातील कवयित्रींच्या कविता नव्या पिढीच्या कवयित्री वाचतात का आणि स्वत:चे परीक्षण केले जाते का, हेदेखील पाहण्याची आवश्यकता आहे, असेही गणोरकर यांनी सांगितले. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्त्रिया कर्तृत्व गाजवीत असल्या तरी अजूनही पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे कर्तृत्ववान महिलांचे काम झाकोळले जात आहे, याकडे विद्या बाळ यांनी लक्ष वेधले. प्रभा गणोरकर यांच्या कवयित्रींवरील या पुस्तकाने माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या. संत कवयित्रींपासून ते जुन्या काळची कौटुंबिक आणि सामाजिक पाश्र्वभूमीही समजली. हे काम त्यांनी झपाटल्याप्रमाणे केले असून, महत्त्वपूर्ण नोंदी या पुस्तकाने प्रकाशझोतामध्ये आणल्या आहेत. पुरस्कार निवड समितीच्या वतीने प्रा. सुजाता शेणई यांनी मनोगत व्यक्त केले. मििलद जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.