नागरिकांनी परिचारिका प्रशिक्षित व नोंदणीकृत असल्याची खात्री करून मगच तिला रुग्णसेवेची संधी द्यावी, असा प्रचार करणाऱ्या परिचर्या परिषदेने सर्व नोंदणीकृत परिचारिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचे ठरवले आहे. परिचारिकेने शिक्षण कुठून घेतले, कोणत्या रुग्णालयात काम केले, ती परिचर्येची शिक्षिका असेल असे पूर्वी तिने कुठे शिकवले या गोष्टींची नोंद या स्मार्ट कार्डमध्ये होणार असून त्याच वेळी ही माहिती परिचर्या परिषदेकडेही भरली जाणार आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. एएनएम, जीएनएम, पदवी व पदव्युत्तर पदवी या सर्व परिचारिकांना स्मार्ट कार्ड लागू होणार आहे. १२ मे रोजी ही योजना जाहीर केली जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले,‘परिचारिकांनी आपले नोंदणी प्रमाणपत्र सतत जवळ बाळगणे अवघड आहे, त्याऐवजी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. सध्या प्रशिक्षित व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीही युनिफॉर्म घालून परिचर्या सेवा देत असल्याची परिस्थिती आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण झाल्यास ते परिचारिकेला नोंदणी प्रमाणपत्र दाखवण्याबाबत विचारतील. परिचारिकेचे शिक्षण, बदली व बढती, पदनाम ही माहिती कार्डमध्ये व परिषदेकडेही भरली जाईल.’ काही वेळा रुग्णालयांमधून परिचारिका अचानकपणे सोडून जातात. परिचर्या शिक्षकांचेही नोकरी बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे रुग्णसेवा व परिचर्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होतो. या परिस्थितीत स्मार्ट कार्डमधील माहिती बदलली गेल्याशिवाय परिचारिकांना पुढील नोकरीवर रुजू होता येणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. बोगस परिचर्या महाविद्यालयांच्या उपद्रवावर उतारा? बोगस परिचर्या महाविद्यालयांच्या उपद्रवावर उतारा म्हणून देखील स्मार्ट कार्ड योजना काम करेल असे परिचर्या परिषदेकडून सांगितले जात आहे. रामलिंग माळी म्हणाले,‘स्मार्ट कार्डमुळे परिचारिकांना बोगस महाविद्यालयात परिचर्या शिक्षक म्हणून रुजू होता येणार नाही. कारण अशा महाविद्यालयाचे नावच परिषदेच्या यादीत नसेल. याद्वारे अशा महाविद्यालयांना शिक्षक उपलब्ध होणार नाहीत.’