पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. बेशिस्त वाहतुकीवर प्रत्येक जण टीका करतो. परंतु सांगवी परिसरात राहणारे प्रल्हाद ज्ञानदेव टकले हे गेली दहा वर्ष गजबजलेल्या बाणेर फाटा चौकात दररोज सायंकाळी वाहतूक नियमन करत आहेत. एका खासगी कंपनीत चालक असलेले टकले यांच्या पत्नीचे दहा वर्षांंपूर्वी निधन झाले आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगणाऱ्या टकले यांनी वाहतूक नियमनाचा ध्यास घेऊन मोठय़ा उत्साहाने हे काम सुरू केले. त्यातून त्यांनी एकटेपणावरही मात केली. बाणेर फाटा चौकात दररोज सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ या वेळेत प्रल्हाद टकले (वय ५३) हे वाहतूकीचे नियमन करतात. एका खासगी कंपनीत चालक असलेले टकले यांच्या पत्नीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बारामती येथे स्थायिक झाला असून विवाहित मुलगी वालचंदनगर येथे राहायला आहे. पत्नीच्या निधनानंतर टकले तसे एकटे पडले होते. सायंकाळी कामावरुन सुटल्यानंतर काय करायचे हा देखील प्रश्न त्यांच्यापुढे होता. स्वत: चालक असल्यामुळे त्यांना पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची जाण होती. आपण वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करु या, असा विचार त्यांच्या मनात आला. दररोज बाणेर फाटा रस्त्याने ते दुचाकीवरुन सांगवी येथे जायचे. त्यांनी वाहतूक पोलिसांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली आणि बाणेर फाटा चौकात वाहतूक नियमनाचे काम सुरु केले. गेली दहा वर्ष टकले हे दररोज सायंकाळी बाणेर फाटा चौकात वाहतूक नियमन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे या कामापोटी त्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा देखील ठेवली नाही. ‘‘मी एका खासगी कंपनीत चालक आहे. सकाळी सात वाजता मी कामावर हजर होतो. मी स्वत: चालक असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची जाण आहे. दिवसभर रस्त्यावर असल्याने पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची मला जाणीव होती. नियम न पाळल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळते, असा माझा अनुभव आहे. पत्नीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. मुले मोठी झाल्यानंतर ती बाहेरगावांत स्थिरावली. कामावरुन सुटल्यानंतर मी घरी एकटा असायचो. आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, याविचाराने मी पोलिसांना वाहतूक नियमनात मदत करण्याचा निर्धार केला,’’ असे प्रल्हाद टकले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक क्रांती पवार, सहायक निरीक्षक विमल बिडवे, हवालदार कांबळे, सोनवणे, देवकर, शिंगे आणि वॉर्डन हत्ते यांनी त्यासाठी सहकार्य केले. सध्या वाहतूक शाखेच्या चतु:श्रुंगी विभागाचे पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे काम सुरु आहे. बाणेर परिसरातील अनेक नागरिकांशी माझी वैयक्तिक ओळख झाली असून बाणेर फाटा चौकात एक दिवस जरी गैरहजर राहिलो तर वाहनचालक आस्थेने चौकशी करतात, असेही टकले यांनी नमूद केले. . ‘‘वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियमन करणे सोपे काम नाही. बेशिस्त वाहनचालक नियम मोडतात आणि पोलिसांशी वाद घालतात.वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी टकले यांनी पोलिसांना सहकार्य केले, याचे कौतुक वाटते. विशेष म्हणजे गेली दहा वर्ष ते निरपेक्ष भावनेने काम करत आहेत.’’ सारंग आवाड (वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त)