पाण्याच्या पिंपाला लाथ मारल्याच्या वादातून पिंपरीत रिक्षाचालकाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

भोसरीतील फुलेनगर झोपडपट्टीत विनोद गिरी राहतात. विनोद हे रिक्षाचालक असून त्यांचा दयाराम गिरी, बाबूराव गिरी आणि जयप्रकाश गिरी या तिघांशी वाद होता. यातील दयाराम आणि बाबूराव हे सख्खे भाऊ आहेत. गुरुवारी रात्री या दोघांपैकी एकाने विनोद गिरी यांच्या घरासमोरील पाण्याच्या पिंपाला लाथ मारली. याचा जाब विचारण्यासाठी विनोद गिरी यांचा मुलगा आकाश हा त्यांच्याकडे गेला. याचा राग बाबूराव, दयाराम आणि जयप्रकाश या तिघांच्या मनात होता. गुरुवारी रात्री उशिरा या तिघांनी आकाशचे वडील विनोद गिरी यांना गाठले. विनोद यांच्यावर चाकूने हल्ला करत आरोपींनी तिथून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनोद गिरी यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. आरोपी आणि मयत हे सर्व जण उत्तर प्रदेशचे आहेत. पोलिसांनी या घटनेचा सुरु करत तिघांनाही ताब्यात घेतले आहे.