मुसळधार पावसामुळे सर्वत्र खड्डे; खडीमुळे वाहने घसरून अपघातांचा धोका

पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवर नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. खोदकामानंतर तात्पुरती मलमपट्टी करून त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, महापालिकेतील ठेकेदारांनी खड्डे दुरुस्ती तसेच रस्त्यांची कामे योग्य प्रकारे न केल्यामुळे रस्ते दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक  रस्त्यांना खड्डे पडले असून खड्डयांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डय़ातून वाट काढणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

एप्रिल-मे महिन्यात शहरातील जुन्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहरातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता तसेच सिंहगड रस्ता, सहकारनगरसह वेगवेगळ्या भागात खोदकाम करून नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या. काही ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. हे काम ज्या वेळी सुरू होते, त्या वेळी शहर, उपनगरातील व्यापारी दुकाने र्निबधामुळे बंद करण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्या वेळी भरपावसात ठेकेदारांनी रस्ते दुरुस्ती केली. खोदकामामुळे पडलेले खड्डे बुजवले. रस्त्यांवर सिमेंटचा थर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. शहरात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठेकेदारांनी केलेल्या रस्ते दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. शहर तसेच उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर तात्पुरत्या कामाने बुजवण्यात आलेल्या खड्डय़ांमधील खडी बाहेर आली आहे.

खड्डय़ांमध्ये पाणी साठल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी, बाहेर पडलेल्या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होऊ  शकतो. शहरातील शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौक, बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, शिवदर्शन परिसर, बिबवेवाडी, सहकारनगर, कर्वेनगर, कोथरूड भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

शहरातील अनेक भागात खोदकामानंतर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मुसळधार पावसामुळे खोदकामानंतर तात्पुरती डागडुजी केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमध्ये पाणी साठून त्यातील खडी बाहेर पडली आहे. शहरातील वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी ज्या भागात पाणी साठते, जेथे खड्डे पडले आहेत अशा भागांची यादी सादर केली आहे. याबाबत महापालिकेला पत्रही पाठविण्यात आले आहे. खड्डयात साठलेल्या पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता आहे. खडीवरून दुचाकी घसरून दुचाकीस्वारांना इजा होऊ शकते.

– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग