आमदार जयदेव गायकवाड यांचा आरोप पुणे : भीमा कोरेगाव येथील दंगलीला नक्षलवादी नव्हे, तर कट्टर हिंदूुत्ववादी संघाचे अतिरेकी हेच कारणीभूत असल्याचा आरोप आमदार जयदेव गायकवाड यांनी केला आहे. अलीकडे देशभर हिंदूू कट्टरवाद्यांना मोकळे रान मिळत असून वेगवेगळ्या कटामध्ये आरोपी असलेल्यांची सुटका केली जात आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे संघाच्या प्रभावाखाली असून दलितविरोधी कारवाया करताना दिसत आहे. भीमा कोरेगावची दंगल हा त्याचाच एक प्रयोग असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे. अलीकडेच पूजा सकट या प्रत्यक्षदर्शीचा बळी गेला आणि भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये होरपळलेल्या दलित कुटुंबाची वाताहत झाली. या दंगल प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी स्वत: व त्यांचे समर्थक या दंगलीत नक्षलवाद्यांचा हात असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, भीमा कोरेगाव प्रकरणामागे पूर्वनियोजित कट आहे, असे घटनाक्रमानुसार सिद्ध करता येते, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे. एकबोटे आणि भिडे गेली १०-१५ वर्षे वढू बुद्रुक स्मारकाच्यानिमित्ताने या परिसरातील बहुजन तरुणांशी भावनिक नाते निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. गोहत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन एकबोटे यांनी जिल्हा परिसरात गाईंना वाचविण्याच्या नावाखाली तरूणांना आक्रमक आणि हिंसक कार्यक्रम दिला. भीमा कोरेगाव विजयस्तंभ इतिहासाबाबत द्वेषमूलक गैरसमज पसरविण्याचे काम ते करीत आहेत. विजयस्तंभाला दोनशे वर्ष पूर्ण होत असतानाच एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट करून वढू बुद्रुक येथील गोविंदा महार समाधीची मोडतोड करून दलित आणि मराठा अशी लढाई घडवून आणायची होती. त्यानुसार त्यांनी १ जानेवारी रोजी डोके भडकलेले तरुण भगवे झेंडे घेऊन भीमा कोरेगाव येथे हल्ले करण्याच्या हेतूनेच आले होते. त्यांना नदीच्या अलीकडे अडवून ठेवल्याने जमावामध्ये गोंधळ उडवून मोठा अनर्थ घडविण्याचा डाव उधळला गेला. या सर्व प्रकरणात नक्षलवादींचा प्रश्न कुठे येतो, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. रावत हे संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. भिडे आणि एकबोटे यांना वाचविण्याचा आणि त्यांचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना भीमा कोरेगाव दंगलीचे खापर नक्षलवादींवर फोडणे हे हास्यास्पद आणि बिनबुडाचे असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. ही दंगल एकबोटे यांनीच घडवून आणली असून त्यांना भिडे, संघ आणि भाजपचा पाठिंबा आहे, हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना माहीत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.