मागील काही वर्षांपासून कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा आजार आपल्याला झाल्याचे समजताच, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जातो. केमोथेरपीचे उपचार घेताना त्या रुग्णांच्या डोक्यावरील केस जातात. हे अनेक रूग्णांना अत्यंत त्रासदायक वाटते. अनेकजण विगचा देखील वापर करतात. मात्र, या विगसाठी देखील डॉक्टरांनी तपासण्या केलेल्या केसांचाच वापर केला जातो. अशाच रुग्णांसाठी पुणे शहरात शिक्षण घेणारी व मुळची वर्धा येथील असलेली १४ वर्षीय ऋत्विजा मून या मुलीने स्वतःचे केस दान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर ऋत्विजा मून हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, रस्त्यावरून जाताना एकादा मला एका मुलीच्या डोक्यावर केस नसल्याचे आढळले. तिला पाहून मला वाईट वाटले, तिला नेमका कोणता आजार झाला आहे, हे मला माहिती नव्हतं. मी याबाबत आईकडे विचारणा केली असता, आईने मला माहिती दिली व जर तुला सामाजिक कार्य करायचे असेल व त्याद्वारे समाधान मिळवायचे असेल तर तू केस दान करावेत, असा सल्ला दिला.साधारण तीन महिन्यापूर्वी आमच्या दोघीमध्ये हा संवाद झाला होता. त्यानंतर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी कुठे केस दिले जातात, याविषयी सोशल मीडियावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. चेंबूर येथील मदत फाउंडेशनच्या माध्यमातुन कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केस दिले जातात, अशी माहिती मिळाली. यानंतर माझे केस कोणत्या प्रकारचे आहेत, ते कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यास काही अडचण तर नाही ना या सर्व बाबींची डॉक्टरामार्फत पाहणी करण्यात आली आणि अखेर मागील आठवड्यात माझे केस कापण्यात आले. ऋत्विजा म्हणाली की, मी केस कापल्यानंतर बाहेर फिरण्यास गेले तेव्हा, अनेकांना या मुलीला काही आजार झाला असेच वाटले. तर काहीजणांनी थट्टा देखील केली. माझ्याकडे कोण कोणत्या नजरेने पाहत आहे, याची मला चिंता नाही. मात्र मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की, एका स्त्रीला माझ्या केसांमुळे या जीवघेण्या आजारातही केसांचे सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे आणि या सारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात नाही. तसेच, आज समाजात अवयवदान, रक्तदान करणारे अनेक व्यक्ती आहेत. पण केसदान करणार्या व्यक्तींची कमतरता आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी केसदान करून खऱ्या अर्थाने दुसर्याचे व्यक्तीचे सौंदर्य फुलवण्यास एक पाऊल पुढे येऊ द्या, असे आवाहन तिने यावेळी केले. यावेळी ऋत्विजाची आई मंगेशी यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला असता, त्या म्हणाल्या की, प्रत्येक स्त्री आपल्या केसांची निगा राखत असते. पण एखाद्या स्त्रीला कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झाला असल्यास, त्या रुग्णांचे केस जातात. हे तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत वेदनादायी असते. ही बाब लक्षात घेऊन आपण अशा रुग्णांसाठी काही मदत करू शकतो का? याबद्दल मुलीसोबत बोललेल होते. त्यावर ऋत्विजाने खूप विचार केला आणि अखेर केस कापण्याचा निर्णय घेतला. तिचा निर्णय पाहून मला खूप आनंद झाला. ज्याप्रकारे माझ्या मुलीने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केसदान केले आहेत. त्याप्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्तीने केसदान करून, खऱ्या अर्थाने अशा रुग्णांच्या सौंदर्यात भर घालून त्यांचे जीवन आनंदी बनवण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.