पिंपरी शहर काँग्रेसची टीका; मतपत्रिकांद्वारेच मतदान घेण्याची मागणी

भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कर्नाटकमध्ये जोरदार चपराक मिळाली असून भाजपचा एकप्रकारे देशभरातूनच परतीचा प्रवास सुरू झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरीत बोलताना केली आहे.

कर्नाटकमध्ये झालेल्या नाटय़मय घडामोडीनंतर भाजपला मिळालेली चपराक आणि कर्नाटकचे अल्पकालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना द्यावा लागलेला राजीनामा, याचा पिंपरी शहर काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. माजी महापौर कविचंद भाट, नरेंद्र बनसोडे, राजेंद्रसिंह वालिया, गौतम आरकडे, लक्ष्मण रूपनर, मयूर जैयस्वाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

साठे म्हणाले, राज्यघटनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपने सातत्याने केला आहे. एकेक राज्य काबीज करताना त्यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. कर्नाटकात जोरदार झटका बसल्याने आता देशभरातूनच त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी या पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे झाल्या पाहिजेत, या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन झाले पाहिजे.