स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेष पदयात्रेकडे पाठ फिरवणारे स्वाभिमानी नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवडच्या सांगवीतील शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावली. यावेळी पुन्हा एकदा खोत यांनी राजू शेट्टी यांना चिमटा काढला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याचा दाखला देत त्यांनी शेट्टींवर मार्मिक टीका केली. राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत ही नाही. तर जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा आणि छोटा होत असतो, या चव्हाणांचे बोल ऐकवत त्यांनी अप्रत्यक्षपणे शेट्टींवर निशाणा साधला.  पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शिवार संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना फसवलं, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. याचे प्रत्त्युत्तर देताना राज्यमंत्री सदाभाऊ म्हणाले की, कोण काय बोलते याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. कोणी काय समजावे आणि काय नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही स्पष्ट दिशा ठरवून काम करत आहोत.

स्वाभिमानीसाठी सदाभाऊ खोत हा विषय संपला-राजू शेट्टी