गैरकारभार, भ्रष्टाचार आणि कंपूशाहीमुळे बदनाम झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळी या सव्वाशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशातून परिवर्तन पॅनेल निवडणुकीच्या िरगणात उतरले आहे. जागतिक कीर्तीची संस्था करण्याचे ध्येय असल्याचा दावाही पॅनेलच्या प्रमुखांनी शनिवारी केला. परिवर्तन पॅनेलचे निवडणूक प्रमुख जगदीश कदम आणि ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पॅनेलच्या माध्यमातून अॅड. एस. के. जैन, आमदार माधुरी मिसाळ, अशोक वझे, वसंत देसाई, जयंत किराड, प्रा. पुरुषोत्तम कुलकर्णी, श्रीकृष्ण चितळे, राजेश पटवर्धन, सतीश पवार, अॅड. मिहिर प्रभुदेसाई, अॅड. दामोदर भंडारी हे निवडणूक लढवीत आहेत. शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळाच्या १२ जागांसाठी बुधवारी (३० मार्च) मतदान होत असून त्यासाठी ४२ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. त्यासाठी संस्थेचे साडेतीन हजार आजीव सभासद मतदान करणार आहेत. पुण्यामध्ये १७६०, मुंबईमध्ये ७४४ आणि सोलापूर येथे ५६० मतदार हे प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावणार असून उर्वरित ५५० मतदारांना यापूर्वीच टपालाने मतपत्रिका रवाना करण्यात आल्या आहेत. कदम म्हणाले, कायद्याने बंधनकारक असूनही गेल्या आठ वर्षांत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नाही. सप्टेंबरमध्ये धर्मादाय आयुक्तांनी नियामक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली, तेव्हाही बरखास्ती झालेली नसून आमच्याच मागणीवरून समिती नियुक्त केली असल्याचे खोटे निवेदन जाहिरातीद्वारे देत निर्लज्जपणाचा कळस गाठला गेला. धर्मादाय आयुक्तांनी नोटीस काढल्यावर माफी मागावी लागली. त्यानंतर ही मंडळी संस्था आपली खासगी मालमत्ता असल्यासारखी संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये मिरवत राहिली.