अमित शहा यांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केली नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा

पिंपरी : शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांना ‘पराचा कावळा’ करण्याची जुनी खोड आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी चिंचवडला  पत्रकारांशी बोलताना केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी, कधीही शिवसेनेला संपवण्याची भाषा केलेली नाही, असा दावा त्यांनी दिला.

पाटील म्हणाले, शिवसेनेला खरं बोलले की जिव्हारी लागते. शिवसेनेचा जो व्यवहार सध्या सरकारमध्ये सुरू आहे, तो आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली नसती, हे खरेच आहे.

आम्ही वैरभावना ठेवून शिवसेनेशी कधीही वागलो नाही. शिवसेना संपवण्याची भाषाही कोणी केली नाही. तरीही शिवसेना आणि राऊत यांना पराचा कावळा करण्याची खोडच आहे. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणे ही भाजपची संस्कृती नाही. आम्हाला जे म्हणायचे ते छातीठोकपणे सांगू. न केलेल्या विधानाचे शिवसेनेने भांडवल करू नये, असे पाटील म्हणाले. वैभववाडीतील भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले. असं जाणं-येणं सुरूच असते. त्या घटनेचा संबंध इतर गोष्टींशी नाही.

शिवसेना संपवण्याची भाषाही कोणी केली नाही. तरीही राऊत यांना पराचा कावळा करण्याची खोडच आहे.

– चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष