ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण ठाकरे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता असंही यावेळी त्यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.

“हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल असं वाटत होतं त्यानुसार झालं. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चाललं आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “मधला काही काळ संकटाचा होता. उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरी कोणती व्यवस्था असती तर वेगळं काही घडलं नसतं. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण लढाई चांगल्या प्रकारे मॅनेज केली. इतर राज्यांमध्ये जाऊन पाहिलं तर त्याचं महत्त्व पटेल. इतर राज्यांमध्ये आपण करत आहोत त्यातील कोणत्याही सुविधा नाहीत. उद्धव ठाकरेंनी आरोग्यविषयक संकटाशी लढताना नेतृत्व केलं, म्हणून कमी हानी झाली अन्यथा अराजक झालं असतं”.

आणखी वाचा- संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक, म्हणाले…

“राज्य सरकारसमोर अनेक आव्हानं आहेत. आव्हान मिर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे. ती आव्हानं आपण राज्यासमोर निर्माण करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या मताचा मी आहे. विरोधी पक्ष राहूच नये असं केंद्रातील सरकारला वाटतं. लोकशाहीत उत्तम विरोधी असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका तयार होताना दिसत असून घातक आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. “अक्ख्या जगाचं लक्ष बिहारकडे लागलं असून तेजस्वी यादव पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी लोकभावना दडपता येणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

“राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ,” असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे. “शरद पवार हे प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे. शरद पवार हे लोकनेते आहेत. मागील कित्येक वर्षात लोकांमध्ये जाणारा नेता मी पाहिलेला नाही,” असं कौतुक संजय राऊत यांनी केलं. “हे सरकार पडणार नाही आणि त्यांच्यातील बोलणंदेखील बंद झालं नाही. उर्वरित चार वर्ष सरकार पूर्ण करेल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

“कंगनाला जास्त महत्व देऊ नये, ती एक संशयित आरोपी आहे. ती पोलिसांसमोर हजर राहणे गरजेचे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा उल्लेख अशा प्रकारे करणे कितपत योग्य आहे. त्यांची लायकी नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आणखी वाचा- …तर त्यांना अटक करून १० वर्षांसाठी अंदमानात पाठवावे – संजय राऊत

“आमचं राजकीय हिंदुत्व नाही. राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडतं. घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मी अजूनही शिवसैनिक असून, शिवसैनिकाला वय नसतं असंही यावेळी ते म्हणाले.

“शरद पवारांचा सल्ला घेतला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याच कारण नाही. शरद पवार यांचा सल्ला देशातील अनेक नेते घेतात आणि ते आपल्या राज्यातील वरिष्ठ नेते आहे. जर त्यांचा आपण सल्ला घेतला नाही. तर आपल्यासारखे आपणच करंटे,” असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. “मोफत करोना लस देण्याच्या लोकप्रिय घोषणा दिल्यानंतर निवडणूक आयोग त्यावर आक्षेप घेत नाही. यावरून निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे असं माझं स्पष्ट आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.