राज्यात शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने सोमवारी जाहीर केले. मात्र नेहमीप्रमाणे पहिल्याच दिवशी विभागाचे संकेतस्थळ कोलमडल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा विरस झाला. संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी येत्या दोन दिवसांत दूर करण्यात येतील, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच शिक्षण विभागाकडून यावर्षी कलचाचणी घेण्यात आली. या कलचाचणीचे निष्कर्ष लेखी स्वरूपात दहावीच्या निकालाबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोमवारपासून हे निष्कर्ष ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचा विरस झाला.

राज्यात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा कल आणि संबंधित क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार होती.

‘एकदम लाखो मुलांनी दुपारी संकेतस्थळाला भेट दिली, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या निकालाच्या फाईल्सचा डेटा खूप होता. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या. येत्या दोन दिवसांत त्या दूर केल्या जातील,’ असे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दीपाली दिवेकर यांनी सांगितले.रोज आठ तास समुपदेशनकलचाचणीच्या निष्कर्षांवरून विद्यार्थ्यांना समुपदेशनही करण्यात येणार असून त्यासाठी ३ मेपासून  हे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण व आवड संकेतस्थळावर नमूद केल्यास त्यांना विविध शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती इत्यादी माहिती या संकेतस्थळावरून मिळणार आहे. त्याचप्रमाणे ८२७५१००००१ या क्रमांकावर करिअर मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका विचारता येणार आहेत. राज्यभरात ३० समुपदेशक रोज आठ तास समुपदेशन करणार आहेत.