पृथ्वीराज चव्हाण यांची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आमचे सरकार असताना गृहखाते माझ्याकडेच ठेवले असते तर आज गुणात्मक फरक दिसला असता, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केली. महाराष्ट्र मीडिया सव्र्हिसेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त ‘सध्याची राजकीय परिस्थिती आणि माध्यमांची ताकद’ या विषयावर सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये चव्हाण बोलत होते. नोटाबंदी, जीएसटी, मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे या राजकीय प्रश्नांबरोबरच दिल्लीतील अनुभव, राज्यामध्ये सरकार चालविताना आलेले अनुभव तसेच वैयक्तिक जीवनातील गोष्टींबाबत चव्हाण यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ‘स्वच्छ प्रतिमा हे तुम्ही आणि फडणवीस यांच्यातील साम्य आहे, तर फडणवीस यांच्या कारभाराकडे तुम्ही कसे पाहता’, या प्रश्नासंदर्भात चव्हाण म्हणाले, विरोधी पक्षात काम करणारे फडणवीस एकदम मुख्यमंत्री झाले. अर्थात अनुभव नाही यात वावगं काही नाही. त्यांच्याकडे स्पष्ट नसले तरी भक्कम बहुमत आहे. मात्र, त्यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले हे चांगले केले. ते मला ठेवता आले असते तर अधिक बरे झाले असते. पण, आमची सत्तेची वाटणी भाजप-शिवसेना युतीच्या वाटपानुसार झाली. देशामध्ये जेथे आघाडी सरकारे आहेत तेथे मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे, असे होत नाही. १९९५ मध्ये सत्तावाटपामध्ये भाजपने शिवसेनेला गंडवले त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे पक्षाचा विस्तार झाला. हे ध्यानात घेऊनच फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले. आता एका प्रतिस्पध्र्याला त्यांनी अलगद बाजूला केले. योग्य निर्णय केले तर, मुख्यमंत्र्यांना चांगले राज्य करता येईल. मात्र, तसे होताना दिसत नाही. सरकारची भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे बाहेर येत आहेत. एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावरील आरोपांची चौकशी केली आहे. मात्र, प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांना वेगळा न्याय लावला गेला आहे. त्यांचे राजीनामे घेऊन चौकशी सुरू केली तर फडणवीस यांची प्रतिमा उजळून निघेल. अमेरिकेच्या दबावातून नोटाबंदी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे या शरद पवार यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. पण, ते भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू असते, याकडे लक्ष वेधून चव्हाण म्हणाले, आमची ताकद ध्यानात घेता एकटय़ाने लढणे योग्य होणार नाही. त्यामुळे पवार यांच्याशी मतभेद आहेत आणि ते राहणार असले तरी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. सुप्रिया सुळे यांना मोदी मंत्रिमंडळात घेणार होते, पण पवार यांनीच त्याचा इन्कार केला आहे. नारायण राणे हे मुळात तिथूनच आले होते. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. भाजप सरकारला सत्तेवर येऊन ४० महिने झाले असले तरी सत्तेवर येण्यापूर्वी जी घोषणाबाजी झाली त्यातील एकही गोष्ट पूर्ण होताना दिसत नाही. मोदी यांनी हिंदूीचा प्रभावी वापर केला. कदाचित ती त्यांची अपरिहार्यता असेल. पण, ते उत्तम वक्ते आहेत. काँग्रेसचे नेते इंग्रजीत विचार करतात आणि मग हिंदूी किंवा मराठीतून बोलतात. आम्ही रस्त्यावर यायला कमी पडलो हे मान्य करायला हवे, अशी कबुली चव्हाण यांनी दिली. खणखणीत नेतृत्व कशाला म्हणायचे. पक्षाचा जाहीरनामा, धोरणे हे सगळे गुंडाळून मोदी यांनी पक्षीय निवडणुकीला अध्यक्षीय निवडणुकीचे स्वरूप प्राप्त करून दिले, अशी टीका चव्हाण यांनी केली. म्हणून गडकरी यांच्याकडे धुरा लंडनची थेम्स नदी स्वच्छ करायला ४० वर्षे लागली. चुटकीसरशी गंगा स्वच्छ करू असे मोदी यांना वाटले. पण, ते होत नाही याचे सत्य त्यांना उमगले आहे. हे अवघड काम असल्यामुळेच मोदी यांनी हे खाते नितीन गडकरी यांना दिले, अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.