साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ आणि दीर्घ मुदतीचे अशा दोन्ही योजनांवर त्याचप्रमाणे साखर उद्योगाला भांडवली गुंतवणूक करण्यासाठी मदत करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले.
महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालय, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट आणि राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ यांच्यातर्फे आयोजित साखर परिषदेच्या समारोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, या परिषदेमध्ये ९४ सहकारी आणि ५५ खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी त्याचबरोबर साखर उद्योगाशी निगडित संशोधन करणाऱ्या १४ संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. साखर उद्योगासमोरील संकटाबाबत विस्तृत चर्चा झाली असून राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती सरकारला अहवाल सादर करेल. उसाचे आणि साखरेचे उत्पादन वाढत असून त्याचा दरावर विपरीत परिणाम होऊन साखर उद्योग अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे साखरेच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉलच्या उत्पादनांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक भांडवली गुंतवणूक करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.