आंबटगोड चिंचेचा हंगाम यंदा जवळपास वाया गेला आहे. अवकाळी पाऊस तसेच करोनाच्या संसर्गामुळे यंदा चिंचेचे उत्पादन कमी झाले असून पुणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठा चिंचेचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीजवळील सुपे चिंच बाजारात यंदा आवकही कमी झाली आहे. हंगाम वाया गेल्याने शेतक ऱ्यांना फटका बसला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत असलेला सुपे उपबाजारातील चिंचेचा बाजार जिल्ह्य़ातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. अवकाळी पाऊस तसेच करोनाच्या संसर्गामुळे यंदा चिंचेचा हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुपे उपबाजारात यंदाच्या हंगामात अखंड आणि फोडलेल्या चिंचेची एकूण मिळून ११ हजार ४५ पोती विक्रीसाठी पाठविण्यात आली होती. अखंड चिंचेच्या एका पोत्याचा भाव प्रतवारीनुसार २५०० ते ६ हजार रुपये होता. फोडलेल्या चिंचेच्या पोत्याचा भाव प्रतवारीनुसार ८ ते १६ हजार एवढा होता. गेल्या उन्हाळी हंगामात सुपे बाजारात एकूण मिळून ४८ हजार ४५४ चिंचेच्या पोत्यांची आवक झाली होती. गेल्या हंगामात चिंच बाजारातील एकूण उलाढाल ६ कोटी रुपयांपर्यंत गेली होती. यंदाच्या हंगामात सव्वादोन कोटी रुपये एवढीच उलाढाल झाली आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे शेतक ऱ्यांना बाजारात चिंच विक्रीस पाठविता आली नाही. त्यातच बाजार बंद असल्याने अपेक्षेएवढी आवक आणि उलाढालही झाली नाही. मागणी नसल्याने चिंचेचे भाव पन्नास टक्क्यांनी कमी झाली. शेतकऱ्यांसह बारामती बाजार समितीला आर्थिक फटका बसला. बाजारात खरेदीदार आलेच नाहीत जिल्ह्य़ातील सर्वात मोठा चिंचेचा बाजार सुपे बाजारात भरतो. उन्हाळी हंगामात इंदापूर, शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, मावळ, फलटण, सोलापूर, सातारा, लातूर, तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बार्शी भागातील व्यापारी खरेदीसाठी येतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील व्यापारी मोठय़ा संख्येने चिंच बाजारात येतात. यंदाच्या हंगामात ठोक खरेदीदार व्यापारी बाजारात फिरकलेच नाही, अशी माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. उलाढाल निम्म्यावर सुपे येथील बाजारात गेल्यावर्षी सहा कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा चिंच बाजारात सव्वादोन कोटी रुपयांची उलढाल झाली असून गतवर्षीच्या तुलनेत उलाढाल पावणेचार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.