दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. पुण्यात आयोजि पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.
“आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नाही. तसंच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्यांच्या निषेधार्थ २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढला जाणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून जवळपास तीस शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलन यशस्वी करण्याची शपथ घेतली जाणार आहे”.
पुढे ते म्हणाले की, “त्याच्याच पुढच्या टप्प्यात २२ डिसेंबरला मुंबईतील उपजिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी इस्टेटवर मोर्चा काढला जाणार आहे. ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी कृषी विधेयक आणले आहे, त्या दोघांमधील अंबानी हे जगात पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत येत आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला एकच विचारायचे आहे की बाबा तुझी नेमकी भूक तरी किती आहे. हे एकदाचे सांगून तरी टाक हे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातुन विचारणार आहोत”.
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे: राजू शेट्टी
प्रकाश आंबेडकर यांनीदेखील शेतकर्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. ते आंदोलन देखील करणार आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले की, “आपले जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. पण आपल्या शेतकर्यांसाठी सर्वांनी एकत्र यावे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. त्यांचे स्वागत आहे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 4:27 pm