राज्यात २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जे मोदी लाटेत निवडून आले. त्या सर्व भाजप आमदारांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगव्याचा अपमान केला आहे. त्यामुळे आता त्यांचा २०१९च्या निवडणुकीत सूड घ्यायचा आहे, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने खासदार सजंय राऊत आणि खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्र. 26 मधील विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख महादेव बाबर, गटनेते संजय भोसले, नगरसेविका संगिता ठोसर, माजी नगरसेवक विजय देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, मागील निवडणुकीतदरम्यान मोदी लाटेमुळे अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार झाले. मात्र, त्यांची काहीही कामे दिसत नाहीत. त्यांचे एकच काम दिसते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे थापा मारणे, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या कार्यपध्द्तीवर टीका केली.

पाटील म्हणाले, मी या मतदारसंघात खासदार म्हणून काम करित आहे. या भागात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, सध्याचे हे सरकार केवळ योजनांची घोषणा करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कामे केली जात नाहीत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे शिवसेनेने आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या लाटेत भाजपचे खासदार कुठेच दिसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी कामाला लागून या मतदार संघावर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.