राज्यात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत एक टप्प्यातील जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, आता शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून डिसेंबरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षकांच्या १२ हजार रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ८७ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत भरती प्रक्रियेत आरक्षणासारख्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्या अडचणी दूर करण्यात काही काळ गेला. तसेच आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पदांवर मुलाखतीविना ५ हजार ८२२ उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मात्र, मुलाखत घेऊन भरल्या जाणाऱ्या पदांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

निवडयादीत संधी न मिळालेल्या उमेदवारांनी शिक्षण आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उर्वरित रिक्त जागांवरील भरती करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पुन्हा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेत जवळपास ७ हजार पदांवरील निवड प्रलंबित असल्याने राज्यभरातील उमेदवारांकडून ही प्रक्रिया कधी राबवली जाणार असा प्रश्न विचारला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर शिक्षक भरती पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित पदांसाठी विविध फेऱ्या राबवल्या जातील. त्यासाठीच्या सूचना पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. शिक्षक भरती डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. – विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त