तापमान चाळिशीच्या आसपास जाण्याचा अंदाज उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर आता तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने उकाडा आणि उन्हाच्या चटक्यांपासून पुणेकरांना सध्या काहीसा दिलासा मिळत असला तरी पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन ते चाळिशीच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या किमान तापमानातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये पुणे शहर आणि परिसरामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. त्यामुळे शहरात उष्णतेची तीव्र लाट होती. २८ एप्रिलला कमाल तापमानाचा पारा सर्वोच्च पातळीवर म्हणजेच ४३ अंशांवर गेला होता. त्यापूर्वी तीन दिवस तापमान ४२ अंशांहून अधिक होते. या हंगामासह गेल्या कित्येक वर्षांती तापमानाचा हा उच्चांक होता. उन्हाचे तीव्र चटक्यांमुळे पुणेकर हैराण झाले होते. रात्रीच्या किमान तापमानाचही सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांची वाढ होऊन ते २५ अंशांवर गेल्याने रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली होती. उन्हाचे चटके आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना मे महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून दिलासा मिळाला. कमाल तापमान तब्बल ७ ते ८ अंशांनी घट होऊन ते ३५ अंशांवर आले. किमान तापमानही २५ अंशांवरून २० अंशांवर आले. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रात्री काहीसा थंडाव्याचा अनुभव येत होता. मात्र, शनिवारपासून (४ मे) तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी ३५.६ अंश कमाल, तर २१.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी आहे. पुढील सात दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, दोन्ही तापमानात दररोज किंचित वाढ नोंदविली जाणार आहे. कमाल तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत, तर रात्रीचे किमान तापमान २४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विदर्भात काहिली कायम; मध्य महाराष्ट्राला दिलासा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. विदर्भामध्ये ५ आणि ६ मे रोजी काही उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, ७ आणि ८ मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेड वगळता इतर ठिकाणी तापमान घटले आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव वगळता सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांखाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल (२९ अंश) आणि किमान (१५.६) तापमान आहे. कोकण विभागातील मुंबई, सांताक्रुझ, रत्नागिरीत सरासरीच्या आसपास तापमान आहे.