राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्याच्या सर्वच भागामध्ये आठवडय़ापासून तापमानात वाढ झाली आहे. सध्या किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत असले तरी दोन्ही तापमान सरासरीच्या पुढे आहे. त्यामुळे दुपारी काही प्रमाणात उन्हाचा चटका जाणवतो. त्याचप्रमाणे रात्रीचा हवेतील थंडावा कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागात रात्रीच्या किमान तापमानाल सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. या भागातून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे.

शनिवारी राज्यात नगर येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे अद्यापही दिवसाचे तापमान ३० अंशांच्या खाली आहे. मात्र, इतर सर्व ठिकाणी ते ३४ ते ३६ अंशांवर पोहोचले आहे. पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर येथे ३४ ते ३५ अंश तापमानाची नोंद होत आहे. या भागात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी अधिक आहे. कोकण विभागातील मुंबईत दिवसाचे तापमान ३२ अंश नोंदविल गेले. या ठिकाणी रात्रीचे तापमान मात्र सरासरीच्या आसपास आहे. रत्नागिरीचा पारा ३५.९ अंशांवर पोहोचला. मराठवाडय़ात कमाल तापमान ३३ ते ३५ अंशांवर असून किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. विहर्भात गोंदियामध्ये अद्यापही थंडी आहे.