नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच असून याद्वारे नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरूडमधील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली. याद्वारे देशातील नागरिकांचे अधिकार आणि कार्ये निश्चित करण्यात आली. राज्यघटनेमुळेच सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, त्याचप्रमाणे देशातील अल्पसंख्याक समाजाच्याहिताचे रक्षण झाले.”

“ज्याप्रमाणे भारतातील अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण झालं त्याप्रमाणं पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या हिताचं रक्षण झालं नाही. त्यामुळे त्यांना तो देश सोडून भारतात आश्रयाला यावं लागलं. अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कुणाचेही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. त्यामुळे देशात या कायद्यावरुन जो गोंधळ घातला जात आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे.” असेही पाटील यांवेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यातील विद्यार्थ्यांवर संविधानाचे संस्कार व्हावेत यासाठी सर्व शाळांमधून संविधानाच्या सामूहिक वाचनाच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे पाटील यांनी यावेळी स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीदेखील संविधानाचे वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.