“एजन्सीचा गैरवापर हे त्यांचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसतं आहे. मागील अनेक वर्षात त्यांची सत्ता आल्यापासून आम्ही जवळूवन पाहिलेलं आहे. शरद पवारांना देखील ईडीची नोटीस पाठवली गेली होती, त्यामुळे हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज म्हटलं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवसास्थानी ईडीने आज छापेमारी केली, त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’च्या छापेमारीवर गृहमंत्री वळसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”राजकारण हे विचाराचं असतं, लोकांच्या सवेसाठी असतं. मी आजपर्यंत या देशात एजन्सींचा वापर, आपल्या विरोधकांच्या विरोधात मी तरी कधी पाहिलेला नाही. एक गोष्ट जबाबदरीने सांगू इच्छिते महाराष्ट्राची संस्कृती आहे, की कधीही सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला गेला नाही. नेहमी विचारांचं राजकारण, जे काही विरोध होतात, मतभेद होते ते वैचारिक होते. यामध्ये एजन्सीचा वापर मी तरी कधी पाहिलेला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणतात, ऑपरेटींग स्टाईल त्यांनी काढलेली आहे, ठीक आहे लढूयात. जाणूनबुजून केलं जातंय असं देखील दिसतय.”

काही दिवसांनी अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या

तसेच, ”आमचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे, महाविकासआघाडी आता राज्याच्या समस्त जनतेची सेवा करण्यात आणि करोनामधून बाहेर पडण्यासाठी सर्वचजण व्यस्त आहेत. आज तिसरी लाट कधी येईल, याची सातत्याने चर्चा सुरू आहे आणि ती लहान मुलांमध्ये येईल असं केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. आता पूर्णवेळ महाविकासआघाडी तिसरी लाट कशी येणार नाही किंवा त्याच्या तयारीसाठी व्यस्त आहे. लोकांची सेवा करण्यासाठी महाविकासआघाडी झाली आहे. वैयक्तिक सूड घेण्याचं आमचं धोरण कधीही नव्हतं आणि कधीही असणार नाही.” असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

याचबरोबर, ”एखादा मोठा पक्ष या देशात करोना, बेरोजगारी आरोग्याच्या एवढ्या अडचणी असताना, सूडाचं राजकारण करतोय, हे अतिशय दुर्दैवी आहे.” असं सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलून दाखवलं.