महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धस्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर सोमवार पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मात्र कोविड चा प्रादुर्भाव पाहता भाविकांना मास्क, सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिरं बंद होती. अखेर भाविकांच्या मागणीनंतर आणि विरोधकांच्या आंदोलनानंतर ठाकरे सरकारने मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार पासून भाविकांना मंदिरांची दारं उघडली जाणार आहेत. आळंदीमधील माऊलींच मंदिर देखील खुले होणार असून यासाठी विशेष दक्षता आळंदी मंदिर प्रशासनाने घेतली आहे. श्री ज्ञानोबारायांच्या मंदिर परिसरात असणाऱ्या दर्शनबारीमधून प्रवेश कणाऱ्या भाविक भक्तांना शक्य तितक्या जवळून श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळावा या दृष्टीने पंखामंडपातून श्रींचे दुरून दर्शन घेऊन पाणदरवाजातून मंदिराच्या बाहेर पडावे अशी रचना करण्यात आलेली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन सुविधा खुली असेल. अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. साधारणपणे दोन ते तीन तासांनी अर्धा तास स्वच्छता व सॅनिटायझेशन करण्यात येणार असून दर्शन तेवढ्या पुरते थांबविण्यात येणार आहे. हा सर्व तपशिल तसेच रांगेतील भाविकांना सूचना मंदिर परिसरात लावण्यात येतील. व्यापक सोयी साठी दोन स्क्रीनच्या माध्यमातून मंदिराच्या बाहेर ही दर्शनाची सुविधा उपलब्ध केली जाईल. तरी सर्व भाविकांनी स्व;शिस्तीचे पालन करीत मंदिर कमिटी व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळेत माऊलींचे दर्शन घेता येणार. सकाळी ६ ते ९ भाविकांचे दर्शन ९ ते ९.३० स्वछता (दर्शन बंद), ९.३० ते १२ भाविकांचे दर्शन दुपारी १२ ते १ गाभारा स्वच्छता आणि नैवेद्य १ ते ३ भाविकांचे दर्शन, ३ ते ३.३० स्वच्छता दर्शन बंद, ३.३० ते ५.५० भाविकांचे दर्शन, सायंकाळी ५.३० ते ६ स्वच्छता दर्शन बंद, ६ ते रात्री ८ भाविकांचे दर्शन