पुण्यातील ओंकारेश्वर घाटावर दशक्रिया विधीसह इतर विधीसाठी आवश्यक असे तांबे, पितळ आणि चांदीच्या साहित्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. घटनेच्या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीजवळ घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत प्रशांत मोघे गुरुजी यांनी माहिती देताना सांगितलं की, "आज आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी ओंकारेश्वर घाटावर आलो. आम्ही इथे दशक्रिया आणि अन्य विधीसाठी लागणारे साहित्य आमच्या ऑफिसमध्ये दररोज ठेवतो. तिथे येऊन पाहिले तर शटर थोडे उचकटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता सर्व साहित्यांची नासधूस केल्याचं दिसलं. चांदी, तांबा, पितळ आणि चांदीचे साहित्य चोरीला गेलं आहे". "जवळपास 40 तांबे, 40 ताम्हण, पळी भांड्याचे 20 सेट, पराती पातेले, चांदीचा तांब्या, 3 भांडी, चांदीचे 2 ताम्हण आणि एक पळी इतकं साहित्य चोरीस गेलं आहे. या सर्व साहित्याची आजच्या घडीला 80 ते 90 हजाराच्या आसपास किंमत आहे. मात्र अशी घटना वर्षभरात तिसर्यांदा झाली असून या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावं, अशी आमची मागणी आहे," असं प्रशांत मोघे गुरुजी यांनी म्हटलं आहे.